निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा न्यायालयाचा सल्ला
मुंबई – गेली 20 वर्षे शिट्टीच्या चिन्हावर निवडणूका लढविणाऱ्या बहुजन विकास आघाडी
पक्षाची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी अडचण झाली आहे. शिट्टी निशानी मिळाली नसल्याने या शिट्टीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या बळीराम जाधव यांच्या पदरी निराशाच पदरी पडली. मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग आणि न्या. एन एम जामदार यांच्या खंडपीठाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा सल्ला देऊन याचिका निकाली काढली.
गेली दोन दशके वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून हितेंद्र ठाकूर यांनी सत्ता प्रस्तापीत केली. तर 2008 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने या पक्षाला लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, नगरपरिषद, पालिका, ग्रामपंचायत अश्या विविध निवडणूकांसाठी शिट्टी हे निवडणूक चिन्ह दिले.. मात्र या पक्षातर्फे लोकसभा निवडणुक लढविणाऱ्या बळीराम लाधव यांना हे चिन्ह न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी निवडणुक आयोगाने हे मुक्त चिन्ह असल्याने ते कुणालाही कायमस्वरूपी दिलेले नाही. तरीही याप्रकरणी आम्ही लक्ष घालू, असे न्यायालयात स्पष्ट केले. तर निवडणुक आयोगाकडे प्रथम दाद मागण्याची संधी असल्याचे लक्षात येताच जाधव यांनी तशी तयारी न्यायालयात दर्शविली. अखेर न्यायालयाने जाधव यांना कोणताही दिलासा न देता याचिका निकाली काढली.