यमाजी मालकर
करोनाच्या साथीमुळे आधुनिक जग एका अभूतपूर्व अनुभवाला सामोरे जाते आहे. त्यामुळे त्या अनुभवाकडे कसे पाहावे, याविषयी समाजात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी हा संवाद सहाय्यभूत होऊ शकतो…
करोना विषाणू चीनमध्ये कसा उत्पन्न झाला, तो जगात आणखी किती जणांचे बळी घेणार, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार का, या साथीतून जगाची सुटका कशी होणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घनतेचा (दर चौरस किलोमीटरला 425 माणसे) विचार करता जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताचे या संकटात काय होणार, या चिंता सध्या प्रत्येकाला सतावत आहेत. मानवजातीला या अभूतपूर्व चिंतेतून दूर करण्यासाठी आणि जगाची चाके पुन्हा फिरण्यासाठी माणूस प्रयत्नशील आहे आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपला नजीकच्या काही दिवसांचा दिनक्रम ठरविणे, एवढेच आज आपल्या हातात आहे. अशाच एका साथीत 400 वर्षांपूर्वी युरोपने आपले दोन कोटी नागरिक गमावले होते, पण त्यावेळचे जग आणि आजचे जग याची कोणत्याच अर्थाने तुलना होऊ शकत नाही.
आधी आजची वस्तुस्थिती समजून घेऊ यात.
1) मानवजातीवर आलेले हे अभूतपूर्व संकट असल्याने ते किती गंभीर आहे, याचा अंदाज अजून जगाला येतो आहे.
2) संकट सर्वव्यापी असल्याने त्याचा परिणाम जगातील 780 कोटी माणसांवर या ना त्या मार्गाने होणार आहे. त्यातून कोणाचीही सुटका होणार नाही.
3)या संकटाने माणसाने निर्माण केलेले सर्व भेद गाडून टाकले आहेत.
4)नियतीने माणसावर नेहमीच विजय मिळविला आहे, तसेच यावेळीही झाले आहे. त्यामुळेच आजच्या अत्याधुनिक जगातील बुद्धीवान माणसाला तिने आज पुन्हा हतबल केले आहे. उद्याचा दिवस कसा असेल, हे आज आपण सांगू शकत नाही.
5)गेल्या काही शतकांत माणसाने घडवून आणलेल्या “विकासा’च्या जोरावर मानवजात आपल्या वर्तमान आणि भवितव्याविषयी इतकी निश्चिंत झाली होती की, आपले अस्तित्व 100 टक्के आपल्या हातात आहे, असे मानून तिने मानवी जगण्याचे प्राथमिक नियम नाकारण्यास सुरुवात केली होती. आता मात्र आपले अस्तित्व सर्वाधिक महत्त्वाचे आहे आणि 100 टक्के परस्परावलंबी आहे, हे मानवाला पुन्हा मान्य करावे लागते आहे.
मनातील अति चिंता दूर करण्यासाठी काय केले पाहिजे?
1)आपल्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि देशांच्या भेदाबाबत आधी एक केवळ माणूस म्हणून या क्षणी निरपेक्ष व्हावे लागेल.
2)सरकार नावाची व्यवस्था, त्यासाठी काम करणारे राजकीय नेते, पोलीस आणि वैद्यकीय व्यवस्था- अशांची क्षमता या अचानक आलेल्या संकटात कमीच पडणार असल्याने ती त्रुटी भरून काढण्यासाठी आपण काय करू शकतो, एवढाच विचार केला पाहिजे आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या आवाहनांना साद दिली पाहिजे.
3)अस्तित्वाच्या प्रश्नापुढे इतर सर्व प्रश्न गौण असल्याने अर्थव्यवस्थेचे काय होईल, रोजगाराचे काय होईल, अशा चिंता आताच करण्याचे कारण नाही. विशेषतः ज्यांच्याकडे अन्नपाण्याची तरतूद आहे, त्यांनी इतर चिंतांचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. आतापर्यंत भौतिक श्रीमंतीचा फुगवटा तयार झाला होता, आता अस्तित्वाचे प्रश्न महत्त्वाचे ठरणार असल्याने अनेकांना तुलनात्मक गरीब व्हावे लागणार आहे, जे स्वीकारले पाहिजे.
4)अन्नपाण्याची तरतूद नसलेल्यांची केवळ चिंता करत बसण्यापेक्षा सरकार, काही कंपन्या आणि समाजसेवी संस्थानी पुढाकार घेतला आहे. त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.(उदा. बॅंकेत थेट रक्कम जमा करणे आणि रेशनवर 80 कोटी नागरिकांना अधिक धान्य देणे) आणि तोच खरा आणि हक्काचा मार्ग आहे.
5)छोटे उद्योग आणि नागरिकांचे कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, बिल भरणा हे या काळात झेपणारे नाहीत, याची सरकारला जाणीव झाली असून त्यासंबंधी सवलतीचे निर्णय झाले आहेत आणि आणखीही होऊ शकतात. अर्थात, त्यामुळे सर्वांच्या समस्या दूर होण्याची शक्यता नाही, पण ती आपल्या व्यवस्थेची मर्यादा म्हणून मान्य करावी लागणार आहे.
6)अन्नपाण्याची गरज भागविण्याच्या पलीकडे मानवी जीवन कसे असावे, याविषयीच्या आधुनिक माणसाच्या मनातील कल्पनांना गेले काही दशके जे प्रचंड धुमारे फुटले होते, त्याला याकाळात तरी स्वल्पविराम द्यावा लागेल.विशेषतः अर्थशास्त्राच्या भाषेत जगाचे मूल्यमापन करण्याऐवजी आता मानवी अस्तित्वाच्या भाषेत ते करावे लागेल.
7)घरी राहा, सुरक्षित राहा, हा आजचा नारा आहे. पण त्यातून जे सर्वांना सहन करावे लागत आहे, त्याकडे जीव वाचविण्यासाठीची परीक्षा म्हणून पाहावे लागेल. म्हणजे घरातीलच काही जणांना वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अतिरेकाचा त्याग करावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला त्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा काही प्रमाणात आदर करण्याचे घरातीलच काहींना शिकावे लागेल.असे नवे धडे घेण्याची तयारी ठेवली तरच हा एक प्रकारे सक्तीचा सहवास आनंददायी होऊ शकतो.
भविष्यात काय होईल, याच्या तीन शक्यता कोणत्या आहेत?
1)चीनच्या वूआन शहरात जसे जीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येऊ लागले आहे, तसे जगाचे जीवन पूर्वपदावर येण्यास हळूहळू सुरुवात होईल. स्वाइन फ्ल्यू जसा अजूनही पूर्णपणे हद्दपार झाला नाही, तसे सुधारित औषधोपचाराच्या मदतीने माणूस करोनासोबत पुढे जगायला लागेल. (स्वाइन फ्ल्यूच्या वेळची सामसूम आठवून पाहा) मात्र कमी रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना करोनाचा धोका कायम राहील. वर्षभरात पुन्हा पूर्वीसारखे जनजीवन प्रस्थापित होईल.
2)करोनासाथ पुढील 15 दिवसांत आटोक्यात आली नाही तर जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळेल आणि त्याचे अतिशय विपरीत परिणाम होतील. विशेषतः 136 कोटींच्या भारतात बेरोजगारीमुळे गंभीर सामाजिक समस्या निर्माण होतील. त्यामुळे सरकारला न भूतो ना भविष्यती अशा उपाययोजना कराव्या लागतील. त्यात आहे त्या संधीचे न्याय्य वितरण (सहा तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम देऊन रोजगार वाढविणे) आणि बेरोजगार तसेच वयस्करांना किमान समान उत्पन्नाची (यूबीआय) तरतूद करावी लागेल. करोनाचा धोका कमी न झाल्याने पूर्वीचे खुले जग हा भूतकाळ होईल आणि आजच्यापेक्षा खूपच वेगळ्या जगात राहण्याची सवय आपल्या सर्वांना करून घ्यावी लागेल.(उदा. डिजिटल व्यवहार, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन कार्यक्रम, शेतीचे महत्त्व वाढेल आणि ग्रामीण भागात राहणे, माणसाला अधिक सुरक्षित वाटेल.)
3)भारतात सध्या तरी ही साथ पसरण्याचा वेग कमी आहे. तो तसाच राहिला तर भारताची अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत लवकर पूर्वपदावर येईल, एवढेच नव्हे तर भारतीय जीवनशैलीचा अवलंब होईल आणि भारतीय वस्तूंना असलेली मागणी प्रचंड वाढेल. गुंतवणूक आणि उद्योग उभारणीसाठी चीनला एक पर्याय म्हणून भारताकडे जग पाहील. त्यातून भारत जगाचे ग्रोथ इंजिन म्हणून मान्यता पावेल आणि भारताची पुन्हा घौडदौड सुरू होईल.