शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन ग्रामस्थांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले. संतप्त ग्रामस्थांनी महिलांसह शिक्रापूर महावितरण विभागाच्या कार्यालयात मोर्चा काढत घोषणाबाजी करून अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देत अधिकाऱ्याला हार देत गांधीगिरी आंदोलन करत वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
शिक्रापूर येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून ग्रामस्थांना कमी दाबाने वीज मिळत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायांवर त्याचा परिणाम होत असल्याने ग्रामस्थांनी माजी उपसरपंच सुभाष खैरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला.
यावेळी माजी उपसरपंच रमेश थोरात, सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल खरपुडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, किरण पुंडे, ज्ञानेश्वर शहाणे, चेतन फुलवरे, दिगंबर शेळके, वैजनाथ काळे, दत्तात्रय भुजबळ, किशोर सातकर, दादा महाजन, पल्लवी हिरवे, सविता शिवले, माई भोसले, उषा सातकर, वैशाली गोरडे, योगिता पायगुडे, वैशाली शहाणे, सारिका थोपटे उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना निवेदन देत गांधीगिरी करीत अधिकाऱ्यांना हार घालून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. वीज पुरवठा आठ दिवसांत सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन करीत विद्युत वितरण कार्यालयात ठिय्या मांडणार असल्याचे संतप्त महिलांनी सांगितले.
प्रश्न तातडीने सोडवला जाईल
उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन म्हणाले की, शिक्रापूर ग्रामस्थांनी केलेल्या मागणीबाबत आम्ही यापूर्वीच कार्यवाही करीत स्वतंत्र रोहित्राची व्यवस्था देखील केलेली आहे. वरिष्ठांशी आजच चर्चा देखील केलेली आहे. ग्रामस्थांचा प्रश्न तातडीने सोडवला जाणार आहे.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, हवालदार शंकर साळुंके यांनी कार्यालयात हजेरी लावली. यावेळी ग्रामस्थांच्या प्रश्नाबाबत वरिष्ठ कार्यालयाशी बोलणे झाले असून लवकर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी दिले.