संतोष पवार
अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण; भरतीबाबत सरकार निर्णय घेणार का?
सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये सुमारे 708 पदे रिक्त आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामाचा ताण वाढताना दिसत आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने रिक्त पदांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असला तरी अद्याप भरती प्रक्रिया राबवण्या बाबत शासनाने निर्णय घेतलेला नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भरतीबाबत निर्णय घेवून सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत असलेले 18 विभागांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून गट क मधील सरळ सेवेची भरती झाली नाही. परिणामी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण येत आहे. विविध विभागात सुमारे 708 पदे रिक्त असून जिल्हा परिषदेने ही पदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य बांधकाम विभाग) -24, कंत्राटी ग्रामसेवक -33, औषध निर्माण अधिकारी- 11, प्रयोगशाळा तंत्रज्ञ -4,आरोग्य सेवक (पुरुष)-49,आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी -159, आरोग्य सेवक (महिला)-347, विस्तार अधिकारी (कृषी)-1, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-44, पशुधन पर्यवेक्षक-25, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)- 1, अंगणवाडी पर्यवेक्षिका -4, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)-1, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)-5 अशा 708 जागा रिक्त आहेत.
जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्येही सदस्यांनी वारंवार आवाज उठवला आहे. मात्र अद्याप तरी शासनाने ही पदे भरण्याचा निर्णय घेतला नसल्याने सर्वच विभागात कामाचा ताण वाढत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे रिक्त पदांबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र अद्याप तरी भरती प्रक्रियेचा निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीचे सरकार सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्यासाठी पावले उचलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्त पदे
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात 708 पदे रिक्त असून एकट्या आरोग्य विभागात सुमारे 570 रिक्त पदे आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याने कामात सुसुत्रता येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. कामाच्या वाढत्या ताणामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रक्तदाब वाढत आहे. त्याचबरोबर त्यांची मानसिकता ढासळत असल्याने शासनाने तात्काळ भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी विविध कर्मचारी संघटनांमधून होत आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील रिक्त पदांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. अनुसुचित जाती प्रवर्गातील 69 पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरु आहे. शासनाची मान्यता आल्यानंतर अन्य पदांच्या भरतीबाबतही निर्णय घेतला जाईल. अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमी संख्या असल्याने कामाचा ताण वाढला असल्याबाबत कोणाचेही दुमत नाही.
– संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. साताराजिल्हा परिषदेच्या विविध विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली तरी सर्वजण एकदिलाने जास्तीत जास्त वेळ देवून काम करत आहेत. निवडणूक प्रक्रिया, जनगणना आदीसाठी स्वतंत्र कर्मचारी द्यावे लागत असल्याने कामाचा ताण आणखीनच वाढत आहे. विविध संघटनांच्यावतीने भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत शासनाशी पाठपुरावा करण्यात आला आहे. शासनाने निर्णय घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.
– मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा