* मुलीच्या लग्नाच्या वयात वाढ सरकारी निर्णयाला चर्चेचे उधाण
* वयाबरोबर शिक्षणही तितकेच महत्त्वाचे
दिलीप धुमाळ
पेठ – ज्या ज्या वेळेस मुलींच्या लग्नाच्या किमान वयाचा मुद्दा चर्चेत आला, त्या त्या वेळेस अनेक चर्चा झाल्या, वादही उपस्थित झाले आहेत. सध्या मुलीच्या लग्नाचे वय अठरा असून, ते वाढविण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे; पण मुलीच्या लग्नाचे वय वाढविणे याबद्दल ग्रामीण भागांतील पालकांबरोबरच इतर अनेक जणांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत.
सध्याच्या स्थितीत मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वत्रच ऐरणीवर आलेला विषय आहे. याबरोबरच मुलींना “ओझं’ मानणारेही आहेत, तसेच हुंडा, गरिबी, मुलींचं शिक्षण… अशा अनेक गोष्टींमुळे मुलींची कमी वयात लग्न लावून दिली जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच आळंदीसारख्या ठिकाणी साखरपुडा झाला, वऱ्हाडी मंडळींची जेवणंही झाली आणि त्यानंतर लक्षात आले की मुलगी सज्ञान होण्यास अजून दोन महिने बाकी आहेत त्यामुळे ते लग्न थांबवण्यासाठी पोलिसांचा आधार घ्यावा लागला आहे. अशा अनेक घटना ग्रामीण भागांत घडत असतात. यामध्ये मुलींचे वय लपवून लवकरात लवकर त्यांना “उजवून’ त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्याकडे मुलींच्या पालकांचा कलही दिसून येत आहे.
बालविवाह रोखण्यासाठी 1978 कायदा करण्यात आला; पण आजही बालविवाह होतच आहेत. हे बालविवाह का होत आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे. कायद्याने मुलींचं लग्नाचं किमान वय 18 वर्षे आणि मुलांचे वय 21 वर्षे आवश्यक असूनही बालविवाह थांबलेले नाहीत. त्यामुळेच मुलींच्या लग्नाचे वय वाढवले तर समोर येणाऱ्या अनेक समस्यांना मुलींच्या पालकांना सामोरे जावे लागणार आहे.
ग्रामीण भागातील सामाजिक स्थिती वेगळी असते. त्यातही अनेक ठिकाणी आदिवासी क्षेत्रही आहे, त्याचाही विचार करण्यात येणे गरजेचे आहे. 18 वर्षे हे मुलींच्या लग्नाचे वय शारीरिक आणि मानकिसदृष्ट्या सक्षम असल्याने त्यांचे लग्नाचे वय 18 वर्षे हेच योग्य आहे.
डॉ. आनंद धुमाळ, युनिकेअर, चाकण
टीव्ही, मोबाइल, समाज माध्यमे या गोष्टींचा परिणाम अलीकडच्या तरुण वर्गावर झाला आहे, त्यामुळे मुला-मुलींच्या मनावर होणारे विपरित परिणामही वाढले आहेत. सध्या पालक तणावयुक्त जीवन जगत आहे. समाजातील आज सर्वच पालक श्रीमंत नाही. आदिवासी, शेतमजूर, कष्टकरी यांना समाजघटकांना मुलींच्या लग्नाचे वय वाढवून ताण देऊ नये. आहे, तसेच वय वर्षे अठरा वर्षे हे योग्य आहे.
दिलीप पवळे, प्रसिद्ध बैलगाडा मालक, पेठ
मुलीचे लग्न केलं गेलं नाही, तर मुलीच्या पळून जाण्याची किंवा बिघडण्याची चिंता आणि भीती पालकांमध्ये असते. अनेकवेळा काही कारणांनी मुलीचे उशिरा लग्न झाले तरी गावांतील लोकांचे टोमणे पालकांना ऐकून घ्यावे लागतात, योग्य वयात योग्य गोष्टी होणे गरजेचे असल्याने सरकारने मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याचा निर्णय अजिबात घेऊ नये.
सोनाली धुमाळ, ग्रहिणी, पेठ
लग्नाचे वय वाढविले तर मुली शिक्षण पूर्ण करून नोकरी करूनही कुटुंबातील जबाबदारी पेलू शकते. ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असते, त्यामुळे तिचे लग्नाचे वय वाढविण्यास काही हरकत नाही.
आशा राजगुरू, अंगणवाडी सेविका, गावठाण पेठ
सध्या ग्रामीण भागात मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे कायद्याने मुलींच्या लग्नाचे वय वाढवल्याने आधीच चिंतेत असणाऱ्या आई-वडिलांवर जबाबदारी अधिक वाढणार आहे.
सोपान नवले, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, आंबेगाव
समाज काय म्हणेल…
मुलगी “मोठी’ होईपर्यंत मुलीचं लग्न केलं गेलं नाही, तर मुलीच्या पळून जाण्याची किंवा बिघडण्याची भीती पालकांमध्ये असते. गावातील प्रत्येकजण आई-वडिलांना टोमणे मारतात की, “आतापर्यंत लग्न का केलं नाही?, “इतके दिवस कसं ठेवलंत’, “पैसे खर्च करावेसे वाटत नाहीयेत का?’ म्हणजेच, आपल्या समाजातील एक मोठा वर्ग आजही मुलींच्या लग्नाचा निर्णय तिच्या वयावरून घेत नाही, तर तिच्या शरीरावरून घेताना दिसतो. मुलीचं वय त्यांच्यासाठी महत्त्वाचं नसतं. शरीर लग्नासाठी आणि बाळ जन्माला घालण्यासाठी योग्य दिसत असेल तर लग्न लावलं जातं. ग्रामीण भागात तर हे सर्रास दिसून येतं.
शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमता
याबाबत अजून एक मतप्रवाह आहे की, मुलींचे लग्नाचे वय वाढवले तर ती मुलगी आगामी काळात शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम होणार आहे आणि त्याचा फायदा तिच्या सासरच्या लोकांनाच होणार आहे, याबरोबरच पुढची पिढी घडवण्यासाठी तिला या दोन गोष्टींचा फायदा होणार आहे.