जयपूर – देशभरामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पदरी मोठे अपयश आले असून लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला केवळ ५२ जागा आल्या आहेत. या मोठ्या पराभवाची करणीमिमांसा करण्यासाठी काँग्रेसतर्फे कार्यकारणी समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि जेष्ठ नेते पी चिदंबरम यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. राहुल गांधी यांनी पक्षाच्या या तीन जेष्ठ नेत्यांवर आपल्या पुत्रांच्या प्रचारासाठी पक्षाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केल्याचा थेट आरोप लावला होता.
२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ हे मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथून विजयी झाले आहेत तर पी चिदंबरम यांचे पुत्र कीर्ती चिदंबरम यांना शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाला आहे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव यांना जोधपूर लोकसभा मतदारसंघातून पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
अशातच आता अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान सरकारमधील मंत्री असलेले काँग्रेस नेते उदय लाल यांनी एका वृत्तसंस्थेला , ‘जर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव हे जोधपूर लोकसभा मतदारसंघातून न लढता जलोर लोकसभा मतदारसंघातून लढले असते तर भाजपला राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंका आल्या नसत्या’ असा दावा केला आहे.
“मी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची ३-४ वेळा भेट घेऊन त्यांना वैभवला जोधपूर मधून उभा करण्याऐवजी जलोर लोकसभा मतदारसंघातून उभा करावे असा सल्ला दिला होता. मी २०१४मध्ये या मतदारसंघातून लढलो असून येथील राजकीय गणितांबाबत माझा चांगला अभ्यास आहे. माझ्या मते वैभव गेहलोत जर जलोर मतदारसंघातून लढले असते तर आज चित्र वेगळेच असते.” असं मत देखील त्यांनी यावेळी बोलताना मांडले.
.