पुणे- ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच घरोघरी सर्वेक्षण सुरू केल्यामुळे बाधितांची संख्या वाढत असून, पुढील संसर्ग टळत आहे. परंतू, या वाढत्या संख्येमुळे ग्रामीणमधील रुग्ण दुपटीचा कालावधी 20 दिवसांवर आला आहे. मागील पंधरा दिवसांत त्यामध्ये दोन दिवसांनी घट झाली आहे. नमुने तपासणी वाढ, घरी जाऊन सर्वेक्षणामुळे ही संख्या कमी झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
शहरातील वाढत्या करोना बाधित संख्येचा आलेख कमी-अधिक होत आहे. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये ग्रामीण भागात बाधित संख्या झपाट्याने वाढली. 30 जूनला रुग्ण दुपटीचा कालावधी 10 दिवसांहून थेट 20 दिवसांवर गेला. मात्र, जुलैमध्ये बाधित संख्या वाढली आणि 9 जुलैला रुग्ण दुपटीचा कालावधी कमी म्हणजेच 14 दिवसांवर आला. 19 जुलैला तर हा कालावधी तब्बल 9 दिवसापर्यंत घसरला होता. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. वाढत्या बाधितांबरोबर मृत्यूच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली, अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने स्वॅब आणि रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट वाढवल्या.
दरम्यान, 4 ऑगस्टनंतर रुग्ण दुपटीचा कालावधी हळूहळू वाढू लागला. सुरवातीला 10 त्यानंतर 16 दिवसांवर दुपटीचा कालवधी होता. मात्र, दि. 4 ऑगस्टला ग्रामीणमध्ये 9 हजार 165 बाधित संख्या होती. तर गुरूवार (दि. 27) पर्यंत ग्रामीणमध्ये 18 हजार 956 बाधित संख्या पोहचली आहे. त्यावरून 28 ऑगस्टला दुपटीचा कालावधी आता 22 दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, गेल्या वीस दिवसात “माझे घर, माझे कुटुंब’ या मोहिमेअंतर्गत घर सर्वेक्षणाला गती मिळाली आहे. त्यातून तत्काळ निदान होत असल्याने संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल आणि काही दिवसांत हा दुपटीचा कालावधी समाधानकारक वाढण्याची अपेक्षा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.