जिल्ह्यात पाण्याची भीषणता गडद : अधिकाऱ्यांची चिंता वाढली
पुणे – जिल्ह्यातील गाव आणि वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या संख्येने “डबल सेन्च्युरी’ मारली आहे. टॅंकरच्या या वाढत्या संख्येने अधिकाऱ्यांची चिंता वाढली असून, पावसाळा सुरू होण्यास अजून एक महिना आहे. तो हे वेळेत पाऊस पडला तर पाणीसाठा होईल, अन्यथा पाणीपुरवठा कसा आणि कोठून करायचा. असा गंभीर प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान जिल्ह्यात मंगळवारी (दि. 7) टॅंकरची संख्या 202 वर जावून पोहचली होती.
एप्रिल महिन्यातील कडक उन्हाळा आणि झपाट्याने आटलेले पाण्याचे साठे यामुळे एका महिन्यात तब्बल 80 ने टॅंकरची संख्या वाढली. मागील सहा वर्षातील सर्वाधिक टॅंकरची संख्या 250 इतकी असून, यावर्षी हा उच्चांक तोडणार हे नक्की आहे. सद्यस्थितीत 118 गावे, 1 हजार 5 वाड्या-वस्त्यांवरील तब्बल 3 लाख 23 हजार नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टॅंकरची संख्या बारामती तालुक्यात असून, येथील 70 हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी 37 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी मुळशी आणि मावळ तालुका सोडून 11 तालुक्यांमधील काही गावांना टॅंकर सुरू करण्यात आले. मात्र, उन्हाचा वाढता चटका वाढल्यामुळे मुळशी तालुक्यातही टॅंकर सुरू करण्याची वेळ आली असून, आठ टॅंकरद्वारे 4 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या दहा दिवसात बारामतीसह पुरंदर, दौंड, इंदापूर आणि भोर याठिकाणी टॅंकरची संख्या अधिक वाढली आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 36 ठिकाणी विहीर आणि बोअर अधिग्रहण करण्यात आले असून, आंबेगाव येथे सर्वाधिक विहिर आणि बोअर आहेत.
जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात 3 हजार बाधिक पशुधन
जिल्ह्यात पशुंना मार्च पर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर एप्रिल महिन्यातील उन्हाचा वाढत्या कडाक्यामुळे उपलब्ध हिरवा चारा वाळून गेला. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याबरोबरच चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झाला. सध्या जुन्नर तालुक्यात 3 हजार 107 बाधिक पशुधन असून, अन्य तालुक्यातही बाधिक पशुधनाची संख्या वाढण्याची भिती आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरू होण्याची गरज आहे.