पिंपरी-चिंचवड शहरातील मृतांची संख्या सुमारे 40 हून अधिक
पिंपरी – गेल्या पाच वर्षांमध्ये पुणे जिल्ह्यात 208 व्यक्तींनी विद्युत अपघातांमध्ये जीव गमावला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 40 हून अधिक व्यक्तींचा समावेश आहे. ह्युमन राईटस् संघटनेने माहिती अधिकारात ही बाब उघडकीस आणली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी होऊनदेखील याप्रकरणी महावितरणच्या कोणत्याही कर्मचारी अथवा अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.
अत्यावश्यक सेवेअंतर्गत वीजपुरवठ्याचा समावेश होतो. मात्र, वीजपुरवठा होत असताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. यामध्ये विद्युत तारेचा स्पर्श होणे, विद्युतप्रवाह जमीनीत अथवा पाण्यात उतरून मृत्यू होणे तसेच डिपी, रोहित्रांचा स्फोट अशा विविध बाबींचा समावेश आहे. या सर्व प्राणांतिक अपघातांची चौकशी महावितरणच्या विद्युत निरिक्षकांमार्फत केली जाते.
यामध्ये अपघाताला कारणीभूत ठरलेली तांत्रिक कारणे व मानवी चुकांचा अभ्यास करुन दोषारोप निश्चित केले जातात. मात्र, आजपर्यंत झालेल्या प्राणांतिक अपघाताला जबाबदार असलेल्या एकाही कर्मचारी अथवा अधिकाऱ्याचे नावे महावितरण प्रशासनाने जाहीर केलेली नाहीत. काही शाखांमध्ये सर्वाधिक प्राणांतिक अपघात होऊनही शाखा अभियंत्याची साधी विचारणाही करण्यात आलेली नाही.
रोहित्राचा स्फोट होऊन, पिंपरी-चिंचवड शहरातील प्राणांतिक अपघातात निष्पाप नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. यापैकी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे घडलेल्या रोहित्राच्या स्फोटात एका चर्मकार बांधवाचा होरपळून मृत्यू झाल्याचे दृश्य मन हेलावणारे होते. तर इंद्रायणीनगरमधील रोहत्राच्या स्फोटात आई, मुलगी आणि नात अशा तीघींचा होरपळून मृत्यू झाला होता. तांत्रिक बाबींचा अभ्यास करताना कमी क्षमतेचे रोहित्र बसवून अधिक लोड दिल्याने या रोहित्राचा स्फोट झाल्याची बाब निदर्शनास आली होती.
अपघातांची चोैकशी करा
या सर्व प्राणांतिक अपघातांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी, अशी मागणी ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेने महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांना निवेदनाद्वारे केली आहे. महावितरणच्या जमिनी स्तरावर विद्युत अपघातांना रोखण्यासाठी काहीही उपाययोजना आखण्यात आल्या नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
एवढ्या मोठ्या स्तरावर मानवी जीवनाची हानी होऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांना अभय द्यायचे धोरण वीज कंपनीने ठेवले आहे . यामध्ये कोणतीही सुधारणा करण्याची मानसिकता दिसत नाही. अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रे उच्चदाब तारा या मानवी वस्तीच्या अगदी जवळ असल्याने प्राणांतिक अपघात होतात. यामध्ये निष्पाप नागरिकांचा हाकनाक बळी जात आहे.
– एम. डी. चौधरी, अध्यक्ष,ह्युमन राईटस् संघटना पिंपरी-चिंचवड