योग्य ती खबरदारी न घेतल्याने दाम्पत्याचा मृत्यू
पुणे : घरात पेस्ट कंट्रोल करणे पुण्यातील दाम्पत्याच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती खबरदारी न घेतल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बिबवेवाडी परिसरातील गणेशविहार सोसायटीमध्ये बुधवारी ही घटना घडली असून अविनाश मजली आणि अपर्णा मजली अशी मृतांची नावे आहेत.
मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याने मंगळवारी घरात पेस्ट कंट्रोल केले आणि त्यानंतर ते नातेवाईकांच्या घरी गेले होते. संध्याकाळी हे दाम्पत्य संध्याकाळी घरी परतले. मात्र पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घ्यावी लागणारी खबरदारी मात्र त्यांनी घेतली नाहीत. त्यांनी घराची दारे-खिडक्या उघडली नाहीत एवढेच नाही तर पंखा चालू न करता टीव्ही पाहत बसले. काही वेळाने दोघांनाही चक्कर आली आणि ते खाली पडले.
रात्री साडेसातच्या सुमारास त्यांची मुलगी कामावारुन परत आली तेव्हा दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले. शेजाऱ्यांच्या मदतीने मुलीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मागील एक ते दोन वर्षात पुण्यामधीलच भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशाप्रकारच्या घटना घडल्या होत्या. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर आवश्यक खबरदारी न घेतल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. हे दोन्ही तरुण मूळचे बीडमधील होते. नोकरीसाठी ते पुण्यात आले होते. तर सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशीच घटना घडली होती. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काही वेळाने घरात येऊन झोपलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यातील नऊ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.