पुण्यात खंडणी वसुलीच्या रोज किमान दोन तरी मोठ्या बातम्या वृत्तपत्रांत वाचायला मिळतात. या तक्रार दाखल झालेल्या प्रकरणाच्या बातम्या असतात. पण दहशतीमुळे जे पोलिसांपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा लोकांच्या प्रकरणांची संख्याही तितकीच लक्षणीय आहे.
पुण्यात हा नवा धंदा तेजीत आहे. त्यातून सामान्य व्यावसायिकांमध्ये मोठीच दहशत सध्या निर्माण झाली आहे. खंडणी वसुलीच्या या धंद्याचे सध्या ठळकपणे दोन प्रकार पुण्यात पाहायला मिळतात. यातील एक प्रकार म्हणजे निव्वळ गुंडगिरीच्या माध्यमातून चालणारी खंडणी वसुली आणि दुसरी राजकीय आश्रयाने कारवाईची धमकी देऊन केली जाणारी खंडणी वसुली असे हे दोन ठळक प्रकार आहेत. अलीकडच्या काळात पुण्यात घडलेल्या या घटनांचा मागोवा घेतला तर खंडणी वसुली ही एक वेगळी इंडस्ट्रीच बनल्याचे दिसते आहे. बांधकामांच्या ठिकाणी वसुलीला जाणाऱ्या टोळ्यांचाही पुण्यातील त्रास वाढला आहे. कोणतेही कारण पुढे करून सचोटीने बांधकाम करणाऱ्यांना त्रास दिला जातो. नसते लफडे नको म्हणून या गुंडांची मागणी पूर्ण करून बांधकाम पूर्णत्वाकडे नेण्याचा बिचाऱ्या व्यावसायिकांचा प्रयत्न असतो.
भविष्यातील त्रास टाळण्यासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास हे व्यावसायिक टाळाटाळ करतात त्यातून या लोकांचे फावते आणि त्यांचे धाडसही दिवसेंदिवस वाढू लागते. कालचाच एक अजबच प्रकार वृत्तपत्रात छापून आला आहे. त्यात मंत्र्यांचा भाचा असल्याचे सांगून एका सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाकडून सहा लाखांची खंडणी वसुलीचा प्रकार घडला आहे. या व्यावसायिकाने निमूटपणे खंडणीखोराची मागणी पूर्ण करून त्याला सहा लाख रुपये दिल्यानंतरही त्याचा त्रास सुरूच राहिला. त्याविषयी सदर व्यावसायिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेला असताना तिथेही या खंडणीवाल्याचा त्याला फोन आला होता, हा फोन त्याने समोर बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याला दिल्यानंतर एखादा गुन्हेगार चपापला असता. पण येथे या गुंडाने आपण मंत्र्याचे भाचे असल्याचे सांगत तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही, अशा शब्दांत त्या पोलिसालाच दम भरण्याचा प्रकार घडला आहे. म्हणजे आता हे खंडणीवाले पोलिसांनाही जुमानेनासे झाले आहेत.
पुण्यातील ही खंडणीवसुली या आधी शहरातील प्रमुख गुन्हेगारी टोळ्यांपुरतीच मर्यादित असायची. या टोळ्यातील गुन्हेगार पूर्ण तयारीचे असायचे, त्यांना कोण कोठे अडकू शकतो याची कल्पना असायची आणि त्याचाच आधार घेत ते धमकी देऊन खंडणी वसुली करायचे. पण आता पोलिसांनी शहरातील बहुतेक मोठ्या टोळ्यांचे गुन्हेगार गजाआड केल्याने या टोळभैरवांचा उच्छाद सध्या थांबला असला, तरी पुण्यात नवनवीन पोरं या व्यवसायात येताना दिसत आहेत. चोऱ्यामाऱ्या करून पैसा कमावण्यापेक्षा राजरोस दादागिरी करून पैसे कमावण्याची नवी क्रेझ या रिकामटेकड्या पोरांमध्ये निर्माण झाली आहे. ही मुले एखाद्या भाईच्या नादाला लागून या क्षेत्राकडे वळू लागली आहेत, तर काही ठिकाणी या मुलांनी स्थानिक पातळीवर स्वत:च हे वसुलीचे प्रकार सुरू केले आहेत. यासाठीचे फंडेही या पोरांनी शोधून ठेवले आहेत. एखाद्या भागात आपली दहशत निर्माण करण्यासाठी त्या भागात कोयते घेऊन हिंडणे आणि वाहनांची तोडफोड करणे हा त्यांचा हुकमी फंडा असतो. ही पोरं तीच असतात जी कधीमधी त्या त्या भागातल्या चौकातील फ्लेक्सवर कोणाच्या तरी वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर दिसत असतात.
रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना धमकावणे, बनावट माथाडी कामगार बनून त्या नावाखाली वसुली करणे, कारवाईची धमकी देत व्यावसायिकांना लुबाडणे हे सारे रोज घडणारे प्रकार पाहिल्यानंतर पुणे हे आता कोणताही नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी सुरक्षित शहर राहिलेले नाही, असे खेदाने नमूद करावे लागते. वाढत्या शहरीकरणाच्या अनुषंगाने ज्या मूलभूत समस्या निर्माण होत असतात त्यात ही स्थानिक पातळीवर फोफावणारी गुंडगिरी हा अविभाज्य भाग असतो. त्याला पायबंद घालण्यासाठी पोलिसांबरोबरच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेणे अपेक्षित असते. पण आज राजकीय आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनीही अनेक ठिकाणी हाच धंदा सुरू केल्याने समस्येचे गांभीर्य वाढताना दिसत आहे. कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीचे खापर पोलिसांवर फोडणे हे अगदी सोपे काम असते. पण तेवढ्याने या समस्येचे निराकरण होत नाही. पुण्यात पोलीस यंत्रणेने गुन्हेगारांवर वचक बसेल अशीच धडक कारवाई केली आहे. अशा लोकांना पोलिसांनी सरसकट मोक्का लावून त्यांना गजाआड केले आहे. याचाच अर्थ पोलीस अगदीच हातावर हात ठेवून बसलेले नाहीत. ते आपले काम करीत आहेतच; पण तरीही जर खंडणी वसुलीच्या क्षेत्रात नवनवीन पोरं येत असतील तर त्याचे खापर कोणावर फोडायचे हा प्रश्न उरतोच.
आईवडिलांनी आपली पोरं ताळ्यावर ठेवावीत असले पुस्तकी सल्ले या बाबतीत पुरेसे ठरणार नाहीत. या नव्या पोरांना नीति-अनीतीचे धडे देऊन त्यांना सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्नही येथे अपुरा पडणारा आहे. या वाढत्या प्रकारांवर धडक कारवाई हाच त्यांना रोखण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. त्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनीही संघटितपणे या प्रकाराच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. तक्रार देण्यासाठी त्यांनी धाडसाने पुढे आले पाहिजे. समोर आलेल्या तक्रारींची पोलिसांनीही तातडीने दखल घेऊन कारवाई शेवटपर्यंत तडीला नेली तरच या गुन्हेगारांमध्ये धास्ती बसू शकेल. आपण जरा जरी वेडेवाकडे वागलो तर आपली धडगत नाही अशी धास्ती जोपर्यंत या पोरांमध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांचे धाडस दिवसेंदिवस बळावतच जाणार आहे. ही गुन्हेगारीमध्ये गुंतलेली किंवा भविष्यात याच वसुलीच्या व्यवसायात जाण्याची शक्यता असलेली मुले शोधणे हे काही फार जिकिरीचे काम नाही.
रस्त्यावर चित्रविचित्र केस रंगवून ट्रिपलसीट जाणाऱ्या पोरांना अडवून जरी पोलिसांकडून विचारणा झाली आणि त्यांच्यावर जरब बसवली गेली तरी त्यांच्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणता येईल. दुसरे बनावट माथाडी कामगाराच्या नावाखाली पुण्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांनाही आता प्रभावी आळा घालण्याची वेळ आली आहे. हा माथाडी कामगार म्हणजे नेमका काय प्रकार आहे आणि त्यांचे अधिकार क्षेत्र कोणते वगैरे बाबी प्रसार माध्यमांद्वारे शासनाने नीट स्पष्ट केल्या पाहिजेत. माथाडी कामगारांच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांवर एक विशेष मोहीम उघडूनच कारवाई करण्याची वेळ आली आहे. पुण्याला पडलेला हा गुन्हेगारीचा विळखा शक्य तितक्या लवकर मोडून काढण्याची गरज आहे.