पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाच बालकांसह त्यांच्या दोन मातांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर दोन बालकांची अतिजोखमीच्या आजारातून सुटका करण्यातही बालरोग विभागाच्या डॉक्टरांना यश आले.
शहरामध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये तरुण व बालकांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढत असतानाही बरे होणऱ्या रुग्णांची संख्याही समाधानकराक असल्याचे सकारात्मक चित्र आहे. शहरात आजपर्यंत 116 रुग्णांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला तर बाकी रुग्ण करोना आजारावर हळूहळू मात करीत आहेत. त्यांच्यावर चौदा दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्या घशातील द्राव एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले जातात. सलग दोनवेळचा तपासणी अहवाल अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर बाधित रुग्णांना घरी पाठविले जात आहे.
“वायसीएम’मध्ये उपचार घेत असलेल्या पाच करोना बाधित बालकांचे व त्यांच्या दोन मातांचे उपचारानंतरचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. सलग दोनदा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने ते करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. चौदा दिवस या पाचही चिमुकल्यांनी झुंज देत या आजारावर मात केली आहे.
16 व 17 एप्रिल रोजी पाच बालके व दोन मातांना वायसीएम रुग्णालयाच्या बालरोग विभागात दाखल केले होते. त्यामध्ये रूपीनगर निगडी मधील 3 बालकांचा व भोसरीतील 2 बालकांचा समावेश होता. या बालकांना वेळोवेळी सर्व उपचार देवून 14 दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले. यापैकी दोन बालकांवर करोनाचे उपचार चालू असतांना त्यांच्या प्लेटलेट्सचे प्रमाण 30 हजार व 66 हजारापर्यंत खाली आल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानुसार स्पष्ट झाले होते.
सशक्त बालकांमध्ये हे प्रमाण दीड लाखाच्या वर असते. या बालकांवर उपचार करून सात दिवसात त्यांच्या प्लेटलेटस (पांढऱ्या पेशी) पूर्ववत करण्यात यश मिळाले. त्यांना बालरोग अतिदक्षता विभागात त्यांच्या मातांसोबत ठेवण्यात आले होते. माता व बालकांच्या 14 दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळ घशातील द्रवाची तपासणी करण्यात आली. त्यांचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे आज त्यांना घरी सोडण्यात आले.
बालरोग विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना आयुक्त श्रावण हर्डीकर, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनिकेत लाठी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच बालरोग विभाग प्रमुख डॉ. दिपाली अंबिके, डॉ. सुर्यकांत मुंडलोड सर्व निवासी डॉक्टर्स, स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे या बालकांनी करोनाला यशस्वी झुंज देत त्यावर यश मिळविले.
आजपर्यंत 49 जण करोनामुक्त
शहरात आजपर्यंत 49 जणांनी करोना विषाणूवर मात केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत एकूण 42 रुग्ण करोनामुक्त झाले होते. आज पाच बालके व दोन मातांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील करोनामुक्त रुग्णांची संख्या 49 झाली आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी असल्याने समाधान व्यक्त होत आहे.