मुंबई : औरंगाबादमध्ये मालगाडीखाली चिरडून १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना याचीच पुनरावृत्ती घडली आहे. पेणमध्ये रोह्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीने रेल्वे रुळावर बसलेल्या तीन तरुणांना चिरडल्याची घटना घडली आहे. पेण शहराजवळ घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुशील वर्मा( २५ वर्ष), सुनील वर्मा (२४ वर्ष) आणि निखिल गुप्ता (२५ वर्ष) या तीन तरूणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. हा अपघात आहे की घातपात याबाबत पेण शहरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. तिघेजण रेल्वे रुळावर कशासाठी गेले होते, हा नेमका अपघात आहे की त्यामागे दुसरे काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
पेण रेल्वे स्टेशनपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर शनिवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी तिघेजण रेल्वे ट्रॅकवर गेले होते. त्यावेळी पेण रेल्वे स्टेशनवरुन एक मालगाडी रोह्याच्या दिशेने जात होती. मालगाडीने ट्रॅकवर बसलेल्या या तिघा तरुणांना चिरडले. अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.