अकलूज (प्रतिनिधी) – माळशिरस तालुक्यात पावसाने जूनसह जुलै महिन्यातही दमदार हजेरी लावली असून तालुक्यात सरासरी 230.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील माळशिरसमध्ये सर्वाधिक 391 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सर्वांत कमी दहिगावमध्ये 174 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर व कालव्याच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी मका, बाजरीची पेरणी केली. काही शेतकऱ्यांनी ऊस लागवडही केली आहे. 23 जूननंतर सतत पडत असलेल्या पावसामुळे या पिकामध्ये पाणी साचू लागल्याने ती धोक्यात आली आहेत.
लागवडीसाठी तयार केलेल्या जमिनीस वाफसा येण्यास विलंब लागणार असल्याने उस लागण लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांनी डाळींब पिकाची छाटणी करून बाग धरली आहे. पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे या पिकावर किटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांना शेतातून चारा काढून आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मात्र, सध्या पावसामुळे जळभावीचा अस्वलदरा तलाव भरला असून, विहिरीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
12 जुलैपर्यंतचा मंडळनिहाय पाऊस
माळशिरस 391 मिमी, सदाशिवनगर 304 मिमी, इस्लामपूर 178 मिमी, नातेपुते 258 मिमी, दहिगाव 174 मिमी, पिलीव 251 मिमी, वेळापूर 216 मिमी, महाळुंग 281 मिमी, अकलुज 291 मिमी, लवंग 302 मिमी.