मुंबई : राज्यात सध्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.त्यातच भाजपकडून सरकारवर आरोप होताना दिसत आहेत. याच सर्व आरोपांना शिवसेनेने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.“राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करावे अशा पद्धतीचा गोंधळ या लोकांनी घातला. प्रश्न असा आहे की, हे सर्व लोक मूर्खांच्या नंदनवनात जणू ‘बेवडा’ मारून फिरत आहेत,” असे म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. तसेच महाराष्ट्रात उघड्यांना नागडे म्हणायचे व गुजरात, उत्तर प्रदेशमधील नागड्यांकडे डोळेझाक करायची..असे खोचकपणे टोला देसखील सेनेकडून लगावण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंगचा ६.३ जीबी डेटाचा पेनड्राईव्ह दाखवत ठाकरे सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून केलेल्या आरोपांचा शिवसेनेने सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे. “परमबीर सिंग यांच्या पत्रावरून लोकसभा आणि राज्यसभेतील भाजपा खासदार आक्रमक झाले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करावे अशा पद्धतीचा गोंधळ या लोकांनी घातला. प्रश्न असा आहे की, हे सर्व लोक मूर्खांच्या नंदनवनात जणू ‘बेवडा’ मारून फिरत आहेत. परमबीर सिंग यांनी शिस्तभंग केला व स्वतःची कातडी वाचविण्यासाठी आरोपांचा धुरळा उडवला आहे हे काय या मूर्खांच्या शिरोमणींना माहीत नाही? परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेले आरोप गंभीर आहेत व त्याची नक्कीच चौकशी व्हावी, पण भाजपावाल्यांच्या प्रिय गुजरात राज्यात संजीव भट्ट व शर्मा नामक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तेथील राज्यकर्त्यांवर केलेले आरोपही धक्कादायक आहेत. त्यावर काय कारवाई झाली? गुजरातचे तत्कालीन राज्यकर्ते हे कसे भ्रष्ट, अनैतिक कार्यात गुंतले होते व त्या कामी पोलीस दलाचा कसा गैरवापर झाला हे भट्ट यांनी सांगितले व त्या बदल्यात भट्ट यांना खोट्या आरोपांत गुंतवून तुरुंगात डांबले.
हे झाले गुजरातचे, पण श्रीरामभूमीत म्हणजे भाजपावाल्यांच्या ‘योगी’ राज्यातही वैभव कृष्ण या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मुख्यमंत्री योगींना पत्र लिहून राज्यात बदल्या-बढत्यांबाबतचे ‘दरपत्रक’च समोर आणले. योगी सरकारच्या गृहखात्याचा पर्दाफाश करणाऱ्या या पत्रावर केंद्रीय गृहखात्याने काय कारवाई केली हे महाराष्ट्रात फुदकणाऱ्या भाजपावाल्यांना सांगता येईल काय? म्हणजे महाराष्ट्रात उघड्यांना नागडे म्हणायचे व गुजरात, उत्तर प्रदेशमधील नागड्यांकडे डोळेझाक करायची. शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या पत्रातील फोलपणा समोर आणला आहे. गृहमंत्र्यांनी ज्या दिवशी वसुलीचे आदेश दिले, त्या काळात अनिल देशमुख इस्पितळात होते व इस्पितळातून बाहेर पडल्यावर त्यांनी आवारातच पत्रकार परिषद घेतली,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
“गृहमंत्र्यांनी या काळात कोठे काय केले याची जंत्री विरोधी पक्ष देत सुटला आहे. म्हणजे विरोधी पक्षावर सरकारची नजर नसून विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्य सरकारवर पाळत ठेवत आहे व हे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्रातील भाजपा खासदारांना कायद्याची थोडी जरी चाड असेल तर त्यांनी केंद्र सरकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर आवाज उठवायला हवा. दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करा असा दबाव राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्यावर टाकला, असा कांगावा परमबीर सिंग करीत आहेत. हा दबाव नसून सूचना असाव्यात व त्यात गृहमंत्र्यांचे काही चुकले असे वाटत नाही. पोलीस आयुक्तांना हे सांगावे लागले याचा अर्थ इतकाच की, केंद्राच्या आदेशावरून ते कोणाला तरी वाचवायचाच प्रयत्न करीत होते.
मोहन डेलकरप्रकरणी जे पत्र लिहिले आहे तो पुरावाच मानला जातो. त्यास मृत्यूपूर्व जबानी म्हटले जाते व त्यास कायदेशीर आधार आहे म्हणून कारवाई करा असे गृहमंत्र्यांना सांगावे लागले. पोलीस टाळाटाळ करीत होते हाच त्याचा अर्थ. परमबीर सिंग हे सर्व विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले व त्याबद्दल भाजपा खासदारांना गुदगुल्या होत आहेत. या अस्वली गुदगुल्या असून हे प्रकरण भविष्यात भाजपावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. परमबीर सिंग यांचे पत्र ज्यांना इतके महत्त्वाचे वाटले, त्यांनी अनुप डांगे या पोलीस अधिकाऱ्याने परमबीर यांच्याबाबत लिहिलेल्या पत्रासही मस्तकी लावून न्याय केला पाहिजे. भाजपाचा हा सर्व खटाटोप का व कशासाठी चालला आहे ते जनतेला माहीत आहे. राष्ट्रपती राजवट लावून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. राज्य सरकारने दीड वर्षात पोलीस आणि प्रशासनावर मांड ठोकली नाही, त्यामुळे काही घोडे उधळले हे स्पष्ट आहे. त्या उधळलेल्या घोड्यांना खरारा करण्याचे व त्यांना हरभरे टाकण्याचे काम विरोधकांनी हाती घेतले असले तरी हे ‘सब घोडे बारा टके’च आहेत. अशा घोड्यांवर शर्यती जिंकता येत नाहीत!,” असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.