मुंबई: विधानसभेचा निकाल लागल्यावर कोणालाही हे तीन पक्षांचे सराकर येईल, असे वाटले नसेल पण हे काम आदरणीय पवार साहेबांनी साध्य केले. त्यात सरकार आल्यावर सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतला व त्याची जबाबदारी माझ्यावर दिली, याबद्दल साहेबांचे आभार, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते.
मुंडे म्हणाले की, या विभागातून नेमके किती आणि काय काम करू शकतो याचा अंदाज मागील १५ दिवसात आला आहे. राज्यातील २२.५% लोकांशी थेट संबंध येतोय हे माझे भाग्य आहे. हे फार मोठं आव्हान आहे आणि यासाठी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या नेतृत्वाची दूरदृष्टी किती आहे ते पहा. जसा काळ बदलतो तसे निर्णय घेण्याची गरज असते. यासाठी पवार साहेबांनी आदेश दिले आहेत की इथून पुढे महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल तसेच राज्यात अशी नावे असलेल्या वस्ती असल्यास ती नावे बदलून योग्य नावे देण्याचे काम पूर्ण होईल.
वंचितातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी अनेक बदल करण्याची गरज आहे. यातून काही घटकांची मनं दुखावली जातील पण हे बदल होणे गरजेचे आहेत. पण ते होणारच, अशी खात्री मुंडे यांनी व्यक्त केली. २०२१ साली १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती ही इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकापुढे साजरी केली जाईल याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे हे माझे थोर भाग्य आहे, असेही ते म्हणाले.