नवी दिल्ली – पहिल्या कसोटी सामन्यानंतर पालकत्वाची रजा घेत मायदेशी परतणार असलेल्या विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा यानेच भारतीय संघाचे नेतृत्व करावे, असे माजी कसोटीपटू इरफान पठाण याने म्हटले आहे.
अजिंक्य रहाणे एक खेळाडू म्हणून चांगला असला तरीही संघात रोहित असताना त्याच्याकडे नेतृत्व सोपवले जाऊ नये, असे मतही पठाणने व्यक्त केले. पत्नीच्या बाळंतपणात काळजी घेण्यासाठी कोहलीला बीसीसीआयने रजा मंजूर केली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे संघाचे नेतृत्व करेल अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर पठाणने आपले मत मांडले आहे.
कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. याचा भारतीय संघावर निश्चितच परिणाम होईल. त्याच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचे नेतृत्व केले पाहिजे. मी रहाणेच्या विरोधात नाही, पण रोहितने स्वतःला कर्णधार म्हणून सिद्ध केले आहे.
मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यासोबत रोहितने भारतीय संघाला निदहास चषक आणि आशिया चषक जिंकून दिला आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्माची संघातली भूमिका महत्त्वाची आहे, असेही पठाण म्हणाला.