श्रीनगर: जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी कलम ३७० हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्यवसायिक तोटा झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विविध निर्बंधांमुळे काश्मिर खोऱ्यातील व्यापारी समुदायाला गेल्या तीन महिन्यांत १० हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
एका व्यावसायिक संघटनेने हा दावा केला आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम ३७० मधील बहुतेक तरतुदी निष्फळ केल्या. त्यानंतर, राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक निर्बंध लादले गेले. हे निर्बंध लागू झाल्यापासून ८४ दिवस झाले आहेत. या निर्बंधांमुळे मुख्य बाजारपेठा बर्याच काळासाठी बंद राहिल्या.
काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शेख आशिक यांच्या म्हणण्यानुसार शहरातील लाल चौक परिसरातील काही दुकाने सकाळी उघडली तर संध्याकाळी अंधार होईपर्यंत सुरु असतात. पण मुख्य बाजारपेठा बंद आहेत. शेख आशिक म्हणाले, परिस्थिती अद्याप सामान्य झाली नसल्यामुळे किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. यावेळी, व्यावसायिक समुदायाला तीव्र झटका बसला आहे आणि त्यातून सावरणे कठीण झाले आहे.
काश्मीर प्रदेशातील एकूण १० हजार कोटी रुपयांचे व्यवसायिक नुकसान झाले आहे. सर्वच भागात खूप नुकसान झाले आहे असून सुमारे तीन महिने झाले लोक अजूनही व्यवसाय करीत नाहीत. अलिकडच्या आठवड्यात काही बाजारपेठा उघडल्या आणि व्यवसाय सुरू झाला परंतु आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार व्यवसाय फारच संथ असल्याचे आशिक म्हणाले.