नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजाराच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत ५०० रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने दावा केला आहे की, देशातील ४७ जिल्हे कोरोना संक्रमणापासून मुक्त झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २३ राज्यातील या जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांपासून कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या आठवड्यात २५ जिल्हे कोरोनामुक्त झाले होते त्यामध्ये आता आणखी २२ कोरोनामुक्त जिल्ह्यांमध्ये भर पडली आहे. त्याचसोबत तबलीगी जमातशी जोडलेल्या लोकांना कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ४ हजार २९१ वर पोहचली आहे.
दरम्यान, आतापर्यंत १ हजार ९२२ रुग्णांनी कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने शनिवारी साडेतीन हजारीचा टप्पा पार केला. मुंबईतील १८४ आणि पुणे शहरातील ७८ रुग्णांसह राज्यात आज नवे ३२८ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात ३ हजार ६४८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकट्या मुंबईमध्ये आतापर्यंत २ हजार २६९ रुग्ण आढळले आहेत.