संयुक्त राष्ट्रांनी केली प्रशंसा
संयुक्तराष्ट्रे – भारताने सन 2005-06 ते 2015-16 या अवधीत सुमारे 27 कोटी 10 लाख लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर आणले अशी माहिती संयुक्तराष्ट्रांच्या अहवालात देण्यात आली आहे. हा बहुतांश कालावधी कॉंग्रेसच्या युपीए सरकारचा आहे. संयुक्तराष्ट्रांच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मालमत्ता, पोषण आहार, सॅनिटेशन इत्यादी सुविधांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. संयुक्तराष्ट्रांचा युएनडीपी, ऑक्सफर्ड पॉवर्टी ऍन्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशीएटीव्ह तर्फे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
केवळ उत्पन्नाच्याच आधारे नव्हे तर आरोग्य, कामाचे स्वरूप, हिंसाचाराची समस्या, अशा गुणांचा विचार करूनही गरीबांची पहाणी करण्यात आली. त्यात भारताची कामगिरी सरस ठरली आहे. जगातील 101 देशांतील जनतेचा स्थितीचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या देशांमध्ये 31 कमी उत्त्पन्नाचे देश, 68 मध्यम उत्त्पन्नाचे आणि 2 उच्च उत्पन्न गटांतील देशांची यात पहाणी करण्यात आली.
दोनशे कोटी लोकसंख्या असलेल्या दहा देशांचा एक स्वतंत्र गट करून यात पहाणी करण्यात आली. त्यात शाश्वत विकास करून लोकांची गरीबी दूर करण्याचे प्रमाण बरेच सुधारलेले आढळले आहे. या दहा देशांच्या गटात भारताचा समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशानेही सन 2004 ते 2014 या अवधीत आपल्या देशातील 1 कोटी 90 लाख लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर आणले आहे.
भारत आणि कंबोडिया या देशांनी आपल्या देशातील गरीबांच्या स्थितीत वेगाने सुधारणा घडवून आणली आहे. गरीबातल्या गरीब माणसांनाही त्यांनी या प्रक्रियेत सामाऊन घेतले होते असा गौरवपुर्ण उल्लेखही यात करण्यात आला आहे. सन 2005-2006 ते सन 2015-16 या अवधीत भारतातील गरीबांची संख्या 64 कोटी 40 लाखांहून 36 कोटींपर्यत खाली आली आहे. पोषण आहार मिळण्याचा अभाव भारतातील 44.3 टक्के लोकांमध्ये होता. ते प्रमाण भारताने या कालावधीत भारताने 21 टक्के इतके खाली आणले आहे. त्याच अवधीत वीजेसारख्या सुविधांपासून वंचित असलेल्या लोकांची संख्या 29.1 टक्क्यांवरून 8.6 टक्के इतकी खाली आणली गेली आहे.भारतातल्या ग्रामीण भागातील गरीबीही याच काळात मोठ्या प्रमाणात दूर झाली असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.