नवी दिल्ली : दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे. दरम्यान, या पुस्तकातून मुखर्जी यांनी काँग्रेस आणि पंतप्रधानपदाविषयी मोठे विधान केले आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद मिळवले तर मनमोहन सिंग यांना ते देण्यात आले होते असे प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे.
गुरुवारी प्रकार्शित झालेल्या आत्मचरित्रात प्रणव मुखर्जी यांनी आपल्या दोन्ही पंतप्रधानांची तुलना केली आहे.‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या मुखर्जी यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन रूपा कंपनीने केले आहे. या पुस्तकातून काही महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात उल्लेख केला आहे की, “अनेक पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याचे तसेच त्यांना जवळून जाणून घेण्याचे सौभाग्य मला मिळाले. प्रत्येकाचा दृष्टीकोन आणि शैली वेगळी होती. ते वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून होते तसंच वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे होते”.
यावेळी त्यांनी म्हटले आहे की, “आपण राष्ट्रपती असताना जुलै २०१२ ते मे २०१४ दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग आणि मे २०१४ पासून ते जुलै २०१७ पर्यंत नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांसोबत काम करण्याची संधी मिळाली असल्याचं म्हटलं आहे. “मी काम केलेल्या या दोघांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग वेगळा होता. मनमोहन सिंग यांना सोनिया गांधी यांनी पंतप्रधान केलं तर दुसरीकडे नरेंद्र मोदी २०१४ मध्ये झालेल्या झालेल्या भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधानपदी विराजमान झाले. ते मुळात राजकारणी असून भाजपाने प्रचाराला सुरुवात करतानाच त्यांना पंतप्रधानपदाचं उमेदवार जाहीर केले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आपली एक प्रतिमा तयार केली होती. त्यांनी पंतप्रधानपद मिळवलं आहे”.
प्रणव मुखर्जी यांनी यावेळी २००४ च्या निवडणुकीत युपीएच्या विजयानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारल्याचाही उल्लेख केला आहे. सोनिया गांधी यांना वारंवार काँग्रेस नेत्यांनी विनंती केल्यानंतरही त्यांना पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला आणि मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा केली असे प्रणव मुखर्जी यांनी सांगितले आहे.
“सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि इतरांनी तो स्वीकारला. मनमोहन सिंग हे मुळात अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून आणि राज्यसभा सदस्य म्हणून राजकारणात काम केलं होतं. पण ते दृढनिश्चयी होते, त्यांच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती होती. यामुळेच इतका विरोध असतानाही त्यांनी अमेरिकेसोबत नागरी अणु करार करुन दाखवला. त्यांनी पंतप्रधान म्हणून चांगली कामगिरी केली,” असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.