हिंजवडी, दि. 28 (वार्ताहर) – बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले।। या उक्तीप्रमाणे एक ऐतिहासिक आदर्शवत घटना आयटीनगरी म्हणून नावारुपाला आलेल्या हिंजवडी गावात घडली. शारदेय नवरात्रोत्सवात घटस्थापना केल्यानंतर देवीच्या पहिल्या पूजेचा व आरतीचा मान गावातील विधवा महिलांना मिळवून देत ग्रामपंचायत सदस्या दीपाली शरद जांभुळकर यांनी परिवर्तन चळवळीचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
हिंजवडी गावठाण नवरात्र उत्सव मंडळाच्या संस्थापिका असलेल्या ग्रामपंचायत सदस्या दीपाली जांभुळकर यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक परंतु आधुनिक विचार सरणीच्या निर्णयामुळे त्यांचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
समाजात धार्मिक कार्यात किंवा लग्नसमारंभात कायम उपेक्षित राहत असलेल्या विधवांना समाजात इतर स्त्रियांप्रमाणे मान सन्मान मिळावा म्हणून दीपाली यांचे पती निवेदक शरद जांभुळकर या दाम्पत्याने हा कठोर परंतु ऐतिहासिक निर्णय घेत गावातील विधवा नवदुर्गांना हळदी-कुंकवाचा आणि आरतीचा बहुमान दिल्याने हिंजवडी ही केवळ माहिती तंत्रज्ञान नगरी नसून वैचारिक नगरी असल्याचे दाखवून दिले. जांभुळकर कुटुंबांनी हा आगळा वेगळा उपक्रम राबवून अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या आधुनिक दुर्गांचा सन्मान केल्याने या महिलांना आता सार्वजनिक, धार्मिक व सामाजिक कार्यात सहभागी होता येणार आहे.
ग्रामस्थांमध्ये कुजबुज
समाज परिवर्तनाच्या निर्णयाबाबत ग्रामस्थांमध्ये विविध मतमतांतरे व कुजबुज सुरू होती.
अखेर काही हातावर मोजण्याइतक्या लोकांचा विरोध झुगारत जांभुळकर दाम्पत्याने सावित्रीबाई व महात्मा जोतिबा फुलेंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून या ऐतिहासिक घटनेला मूर्त रूप दिले.
हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज व स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या सावित्रीबाई तसेच महात्मा जोतिबा फुले यांनी अनेक अनिष्ठ चालीरीती व प्रथांना पायबंद घातला होता. शाहू महाराजांच्या याच कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने अलीकडेच विधवा प्रथा बंद करण्यासाठी ग्रामसभेत ठराव संमत केला होता. त्यामुळे असंख्य विधवांना सामाजिक कार्यात अग्रगण्य स्थान मिळाल्याने असंख्य स्त्री जातीला नवसंजीवनी मिळाली आहे. याची पुनरावृत्ती नुकतीच आयटीनगरीत झाल्याने कुठलाही दोष नसताना वैधव्य येणाऱ्या असंख्य महिलांना सन्मानाने सामाजिक व धार्मिक कार्यात मिसळता येणार आहे.
या महिलांना मान-सन्मानापासून वंचित ठेवले जायचे. अशा संकुचित विचारसरणीवर मात करणे काळाची गरज होती. विधवा प्रथा बंद व्हावी, त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी हिंजवडी गावठाण नवरात्र उत्सव मंडळाने पुढाकार घेतला. त्यास इतरही मंडळातील सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला. गावातील अनेक जुन्या जाणत्या लोकांशी चर्चा करून अखेर आम्ही हा निर्णय घेतला. परंतु त्याचे सर्वत्र जोरदार स्वागत होत असून, चांगल्या उपक्रमाचा शुभारंभ झाल्याचा मनस्वी आनंद आहे.
– दीपाली शरद जांभुळकर,ग्रामपंचायत सदस्य.
ग्रामसभेतील ठराव आणला प्रत्यक्षात
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत साखरे यांनी सर्वप्रथम 8 मे रोजी झालेल्या ग्रामसभेत हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्यावर अनेकांनी मतमतांतरे मांडल्याने या निर्णयाची सुरुवात कुणी करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर नुकत्याच 13 सप्टेंबरला झालेल्या ग्रामसभेत शासन आदेशानुसार विधवा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मान सन्मान देणे, कार्यक्रमात सामावून घेणे, हा विषय पत्रिकेवरील विषय ग्रामविकास अधिकारी तुळशीदास रायकर यांनी सभेसमोर मांडला असता सभेला उपस्थित असलेल्या जांभुळकर दाम्पत्याने या धाडसी निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले. त्यानुसार त्यास सरपंच मच्छिंद्र हुलावळे यांनीही अनुमोदन दिल्याने हा ठराव मंजूर झाला होता.