मोरबी – गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात बुधवारी मीठ पॅकेजिंग कारखान्याची भिंत कोसळून किमान 12 मजुर ठार झाल्याची घटना घडली आहे.
हलवड औद्योगिक परिसरात असलेल्या सागर सॉल्ट कारखान्यात ही दुःखद घटना घडली, असे राज्याचे कामगार व रोजगार मंत्री ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले. तेच या मतदार संघातील स्थानिक आमदारही आहेत.
ही दुर्घटना घडली त्यावेळी कारखान्यात अनेक मजुर काम करीत होते. बारा जणांचे मृतदेह सापडले असून कारखान्यात अडकलेल्या अन्य मजुरांना बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या दुर्घटनेत इतर अनेक जण जखमी झाले आहेत.
ही भिंत नेमकी कशामुळे पडली याची माहिती घेतली जात आहे. मृत मजुरांची ओळख पटली असून घटनास्थळी सरकारी यंत्रणांनी आणि अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे.