नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर आता गोव्याचेही मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत अशी माहिती आम आदमी पक्षाने दिली आहे.पक्षाच्या मुख्यालयात बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी हा दावा केला.
ते म्हणाले की, गोव्यात विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकार जिंकणे अवघड झाल्याचे लक्षात आल्यानेच भाजपकडून ही खेळी केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून मात्र अजून प्रतिक्रीया आलेली नाही.
प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काळात गोव्यात काही कामच केलेले नाही. त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत आणि ही नाराजी ते आता उघडपणे बोलून दाखवू लागले आहेत म्हणून त्यांना बदलण्याखेरीज निवडणुक जिंकता येणार नाही अशी भाजपची धारणा झाली आहे असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.
भाजपने मुख्यमंत्री बदलला तरी गोव्यात आम आदमी पक्षाचा विजय कोणीच रोखू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.