नवी दिल्ली – निवडणुकांच्या काळात पक्षबदलाला सुकाळ येत असल्याच्या बाबीवर एका अहवालातून शिक्कामोर्तब झाले आहे. त्या अहवालानुसार, 2016 ते 2020 या पाच वर्षांच्या कालावधीत झालेल्या विविध राज्यांतील निवडणुकांवेळी तब्बल 170 आमदारांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्लू) या संस्थांनी मागील पाच वर्षांत पक्ष बदलून निवडणुका लढवणाऱ्या 433 आमदार आणि खासदारांच्या प्रतिज्ञापत्राची छाननी केली. त्यातून तयार करण्यात आलेल्या अहवालातून महत्वाची राजकीय आकडेवारी समोर आली आहे.
पक्षबदलाचा सर्वांधिक राजकीय फायदा भाजपला, तर तोटा कॉंग्रेसला झाला. पाच वर्षांच्या कालावधीत एकूण 405 आमदार पक्ष बदलून निवडणुकांना सामोरे गेले. त्यातील 182 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याखालोखाल 38 आमदारांनी कॉंग्रेसचे, तर 25 आमदारांनी तेलंगण राष्ट्र समितीचे घटक बनणे पसंत केले.
संबंधित कालावधीत एकीकडे मोठ्या संख्येने कॉंग्रेस आमदार पक्षाबाहेर पडले असताना दुसरीकडे भाजपला केवळ 18 आमदारांनी रामराम ठोकला. मागील काही काळात मणिपूर, गोवा, अरूणाचल प्रदेश, कर्नाटक आणि मध्यप्रदेशात पक्षांतरामुळे सत्ताबदल किंवा सत्ताधारी निश्चित झाल्याकडे अहवालातून लक्ष वेधण्यात आले आहे.
राज्यसभा आणि लोकसभेच्या मिळून 28 खासदारांनी मागील पाच वर्षांत पक्षबदल केला. पक्षबदल केलेल्या राज्यसभेच्या 16 पैकी 10 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभेच्या 7 खासदारांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. देशात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्या सभागृहाचे सदस्य असणाऱ्या 12 खासदारांनी पक्ष बदलला. त्यापैकी 5 खासदारांनी भाजपला रामराम ठोकला, तर तितक्याच खासदारांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
े