– अशोक सुतार
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची आपली तयारी असल्याचे सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्याबाबत…
कर्नाटकात नेतृत्वबदलाची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. यापूर्वी जेडीएस, कॉंग्रेसचे सरकार कर्नाटकात होते. त्यावेळी भाजपने राजकारण करत काही आमदार आपल्याकडे वळवत अपेक्षित सत्ताबदल केला होता. भाजपचे सरकार सत्तेवर आले तरी सरकारला अजून स्थैर्य मिळाले नसल्याचे दिसते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात भाजपामधूनच वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात काही मंत्री आणि आमदारांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. यावर बोलताना येडियुरप्पा यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत हायकमांडने माझ्यावर विश्वास ठेवला आहे, तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर कायम राहीन.
ज्या दिवशी ते आपल्याला पद सोडायला सांगतील, त्याचक्षणी आपण राजीनामा देऊ. पण त्यानंतरही राज्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करत राहू. खरेतर येडियुरप्पा हे दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर आले आहेत. त्यांच्याच प्रयत्नाने कर्नाटकात जेडीएस, कॉंग्रेसला बाजूला सारून भाजपाची सत्ता आली आहे.
परंतु दोन वर्षात येडियुरप्पा यांच्या विरोधात भाजपमधील वातावरण तापले आहे. येडियुरप्पा यांच्याबद्दल पक्षात का नाराजी आहे, याचा हायकमांडने शोध घेण्याची गरज आहे. कारण अशीच परिस्थिती राहिली तर पक्षात बेदिली माजून कर्नाटक सरकार अस्थिर होऊ शकते. भाजपने जो डाव जेडीएस, कॉंग्रेसच्या सरकारवर टाकला होता, तो त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.
नाराज आमदारांच्या एका गटाने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना काढून टाकण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसत आहे. कर्नाटक राज्य सरकारच्या नेतृत्वाविरोधात तक्रारी घेऊन काही नेते अलीकडेच दिल्लीला गेले होते. येडियुरप्पा यांना हटवून नवीन पर्यायी नेतृत्व द्या, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे होते.
येडियुरप्पा यांनी म्हटले आहे की, राज्यात पर्यायी नेतृत्व नाही असे होऊ शकत नाही. राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षात पर्यायी नेते नेहमी असतात. याचा अर्थ येडियुरप्पा यांना कर्नाटक सरकारमध्ये नेतृत्वात बदल होईल, असे वाटत नाही. तसेच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला करताना हायकमांडला गंभीरपणे विचार करावा लागेल.
येडियुरप्पा यांच्याविरोधात कर्नाटक भाजपमधील वातावरण वाढले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी येडियुरप्पा यांच्यावर अनेकवेळा टीका केली आहे. पंचायतराज व ग्रामीण विकास मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी आपल्या खात्यात मुख्यमंत्री सतत हस्तक्षेप करीत असल्याची हायकमांड व राज्यपालांकडे तक्रार केली होती.
पर्यटनखात्याचे मंत्री सी. पी. योगेश्वर आणि आमदारांनी मागील आठवड्यातच दिल्लीला जाऊन नेतृत्वबदलाची हायकमांडकडे मागणी केली होती. त्याबरोबर येडियुरप्पा समर्थक आमदारांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले होते.
कर्नाटकात या सर्व घडामोडी घडत असल्यातरी हायकमांडने येडियुरप्पा यांच्या नेतृत्वबदलाचा अजूनतरी विचार केलेला नाही, असेच दिसते. ज्या येडियुरप्पा यांनी विरोधकांचे सरकार पाडून भाजपच्या सरकारची स्थापना करण्यात पुढाकार घेतला व भाजपचे नाव राखले. त्या येडियुरप्पा यांना मुख्यंमत्रिपदावरून पदच्युत करणे, हायकमांडला शक्य नाही, असेच दिसते.
कर्नाटकातील नेतृत्वबदलास आपला विरोध नाही, हे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे विधान म्हणजे एक राजकीय डावपेचाचा भाग असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने त्यांच्या विरोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
येडियुरप्पा यांना जोपर्यंत हायकमांडचा पाठिंबा आहे, तोपर्यंत कोणी काहीही करू शकत नसल्याचा स्पष्ट संदेश येडियुरप्पा यांच्या प्रतिक्रियेतून पक्षांतर्गत विरोधकांना गेला असल्याचे म्हटले जात आहे. कर्नाटकात येडियुरप्पाच भाजपचे बाहुबली असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.
येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविताच त्यांच्या समर्थक आमदारांनी, ते मुख्यमंत्रिपदावर राहावेत म्हणून सह्यांची मोहीम हाती घेतली. येडियुरप्पा कार्यकाळ संपेपर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहावेत, यासाठी त्यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम महत्त्वाची ठरते. येडियुरप्पा यांना भाजपच्या 80 टक्के आमदारांचा पाठिंबा असल्याने ते कर्नाटकचे नेतृत्व कार्यकाळ संपेपर्यंत करतील, असे वाटते.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी म्हटले आहे की, राज्य भाजपमध्ये कोणतेच मतभेद नाहीत. येडियुरप्पा हेच आमचे नेते असून मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही. केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
हायकमांडसमोर असा कोणताच प्रस्ताव नाही. कर्नाटकमधील भाजपच्या विविध महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या की, लक्षात येते की येडियुरप्पा यांच्या विरोधात काहीजणांचे चाललेले पक्षांतर्गत बंड मोडले जाईल आणि येडियुरप्पा पुन्हा कर्नाटकचे नेतृत्व करण्यास सिद्ध आहेत.