कोल्हापूर(प्रतिनिधी) – भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु प्रकल्प फुटून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. मेघोली परिसरातील शेकडो हेक्टर शेती जमीनदोस्त झाली आहे. या धरणफुटी प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना इमेल द्वारे निवेदन सादर करून वरील विषयात आपण गांभीर्याने लक्ष घालून यातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणून यात झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित करून या भागातील शेतक-यांना न्याय द्यावा.’अशी मागणी केली आहे.
पाटील यांनी म्हटले आहे की, ‘ हे धरण कोणत्या कारणाने फुटले याची सखोल चौकशी व्हावी, या धरणावर गेले कित्येक दिवस चौकीदार नव्हता हा चौकीदार कोठे होता याची देखील चौकशी व्हावी, भविष्यातील पाण्याची उपयुक्तता लक्षात घेऊन पुन्हा नव्याने धरण बांधणीसाठी प्लॅन तयार करून संबंधित विभागाकडे त्वरित मंजुरीसाठी पाठवावा, सदर ठिकाणी शेतजमीन नापीक झाली असून अशी जमीन पुन्हा उपयोगात आणण्यासाठी सरकारकडून एकरी 1लाख अनुदान मिळावे, धरण परिसरातील नागरीकांचे नुकसान झाल्यामुळे लाईट बिल माफ करण्यात यावे.’