आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरु होण्यापूर्वी, सुरु असताना व संपल्यावर एक चर्चा नेहमी दिसून येते की या टी-20 लीगमुळे कसोटी क्रिकेट जिवंत राहील का, खरेतर हा प्रश्न वारंवार का विचारला जातो. इंग्लंडमध्ये फुटबॉल सामन्यांकडे प्रेक्षक वळू लागला व क्रिकेटचा प्रेक्षक कमी होऊ लागला होता. कारण सहा सात तास चालणारे क्रिकेट पाहण्यापेक्षा दीड ते दोन तासांत संपणारा फुटबॉल सामना पाहावा हा विचार जोर धरू लागला.
यातून मार्ग काढण्यासाठी टी-20 क्रिकेटचा जन्म झाला. तीन ते चार तासांत संपणारे सामने लोकप्रिय होऊ लागले. तसेच या सामन्यांमध्ये चेंडू निर्धाव जाणे किंवा प्लेड करणे गुन्हा ठरू लागले. चौकार व षटकारांची बरसात होऊ लागली व टी-20 सामन्यांचा वेग सगळ्यांनाच भावला. याच आक्रमकतेमुळे सामने पाहणारे व आयोजन करणारे सगळेच जोशात होते.
एकतर कमी वेळेत संपणारा सामना व प्रचंड आर्थिक फायदा करुन दोणारा सामना प्रत्येकाच्याच पसंतीला उतरला. मात्र, त्यातच कसोटी क्रिकेट किंवा एकदिवसीय क्रिकेट रटाळ होईल व त्याचे अस्तित्वच संपेल या चर्चांना उधाण आले. इतकी वर्षे झाली टी-20 क्रिकेटला व ते रुळलेही चांगले परंतु त्याने कसोटीवर कोणतीही गदा आली नाही व येणारही नाही. कारण कसोटी हा क्रिकेटचा गाभा आहे व भारतासारख्या देशांचे सोडा पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंडसारख्या देशांत आजही कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट मानले जाते.
आयसीसीनेही कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु करुन हे क्रिकेट कायम राहील यासाठी प्रयत्न यशस्वी करुन दाखवले. त्यामुळे एकदिवसीय काय, टी-20 काय असे कितीही पौशांचे छापखाने सुरु झालेले असले तरीही कसोटी क्रिकेटचे महत्त्व कधीही संपणार नाही. आता तर टी-20 पेक्षाही वेगवान असे टी-10 क्रिकेट दाखल झाले आहे. टी-20 मुळे एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेट संपले नाही व संपणारही नाही पण टी-10 क्रिकेटमुळे भविष्यात कदाचीत टी-20 क्रिकेटच संपण्याचा धोका आहे.