मंचर – फुलवडे भगतवाडी (ता.आंबेगाव)गावाजवळ डोंगरावरून रविवारी (दि. 4) दगड निसटून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर नागरिकांना जवळील औंदुबरेश्वर मंदिर, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिरात हलवण्यात आले आहे.
आंबेगाव तालुक्यात पाच धोकाग्रस्त गावांमध्ये फुलवडे भगतवाडी गाव आहे. भगतवाडीतील घरांच्यावर असलेल्या डोंगरावर भरपूर दगड आहेत. यातील नऊ घरांजवळ डोंगरावरून एक दगड निसटून आला. त्यामुळे अजून दगड पडतील या भीतीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर ग्रामस्थांनी तात्काळ प्रशासनाला कळवल्यापने गटविकास अधिकारी राहुल काळभोर, बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. टी. डाके यांनी घटनास्थळी जावून पहाणी करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. तसेच या 9 कुटूंब पैकी 6 जणांना शबरीचे घरकुल दिले आहे, ही घरकुले देखील बांधून पूर्ण झाली आहेत.
फार वर्षापासून या वाडीच्या दगडांचा धोका आहे. आज यातील एक दगड खाली आला आहे जर अजून काहि दगड खाली आहे तर संपुर्ण वाडीला धोका निर्माण होऊ शकतो. माळीण सारखी पुनरावृत्ती भगतवाडीची होऊ शकते. यासाठी तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी कायमस्वरूपी पुनर्वसन होणे आवश्यक आहे.