मुंबई – सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने देशाचा बेरोजगारीचा आकडा नुकताच प्रसिद्ध केला असून त्यानुसार सुमारे साडे आठ टक्क्यांनी बेरोजगारी वाढली आहे. हा आकडा धक्कादायक आहे. ऑगस्ट महिन्यात साडेपंधरा लाख लोकांचा रोजगार गेला आहे. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी मोदी सरकारला केला आहे.
सुरुवातीपासूनच केंद्रातील मोदी सरकारचे धोरण लोकांना रोजगार मिळण्यास अनुकुल राहिलेले नाही. केंद्र सरकारने नोटबंदी केली, जीएसटी करप्रणाली आणली पण उद्योगधंद्यांना जी चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही आणि परिणामी देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला, असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.
दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असे सांगणारे मोदी सरकार रोजगार देण्यात अपयशी ठरले आहेच शिवाय लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही सोडवू शकलेले नाही ही वास्तविकता समोर आली असल्याचे महेश तपासे म्हणाले.