अमरावती – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त जिल्ह्यात आज ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. यानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अमरावती कार्यालय व कस्तुरबा सोलर खादी महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजयंतीनिमित्त २५ चरख्यांवर सलग पाच तास सूत कताई करून महात्मा गांधीना अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली.
कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या वतीने मागील ५ वर्षापासून देशातील पहिला विकेंद्रित सोलर चरखा प्रकल्प अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील २५० महिला सोलर चरख्यावर सुत कताईच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनल्याअसून मागील पाच वर्षापासून कापूस ते कापड उत्पादन साखळी अमरावती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
येथील औद्योगिक वसाहतीतील कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या मुख्यालयात आज हातचरखा, पेटी चरखा, अंबर चरखा ,सोलर चरखा आदी विविध २५ चरख्यांवर सलग पाच तास सुत कताई करण्यात आली. यावेळी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर आणि रजिस्टार तुषार देशमुख यांनी भेट देऊन सुत कताईच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली अर्पण केली.