अमेठी – गांधी घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीच्या लढाईत पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप आणि कॉंग्रेस हे दुसऱ्या पक्षांतून आयात केलेल्या उमेदवारांच्या आधारे निवडणूक लढवत असून तेथील लढाई आता चुरशीची बनली आहे. अमेठी लोकसभा मतदार संघातून खुद्द राहुल गांधी हेच गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने हा भाग आता कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नसला तरी भारतीय जनता पक्षालाहीं या भागातील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी कसोशिचे प्रयत्न करावे लागत आहेत.
अमेठीत भाजपने पुर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे दिग्गज नेते संजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे, त्यांनी 2019 मध्ये कॉंग्रेस मधून भाजपच्या छावणीत प्रवेश केला आहे, तर कॉंग्रेसने आशिष शुक्ला यांना विधानसभेच्या या जागेवर उमेदवारी दिली आहे.
शुक्ला हेही आयात उमेदवार आहेत. त्यांनी बसपामधून राजकारणाला सुरूवात केली होती. त्यानंतर ते 2017 मध्ये भाजपमध्ये गेले होते आणि आता ते कॉंग्रेसच्यावतीने मैदानात उतरले आहेत. संजय सिंह यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपने केल्यानंतर काही अवधीतच शुक्ला यांना दिल्लीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्यांना अमेठीतून उमेदवारी देण्यात आली.
कोणताही वेळ न गमावता, सिंह आणि शुक्ला यांनी आपापल्या नवीन पक्षांशी निष्ठेची शपथ घेतली आहे. संजयसिंह यांनी भाजपशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली आहे तर शुक्ला यांनीही आता यापुढील राजकीय वाटचाल कॉंग्रेसबरोबरच असेल असे स्पष्ट केले आहे. समाजवादी पक्षाने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गायत्री प्रजापती यांच्या पत्नीला अमेठी विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी दिली आहे.
बहुजन समाज पक्षाने येथे रागिणी तिवारी यांना उमेदवारी देऊन पुन्हा एकदा येथे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अमेठी लोकसभा क्षेत्रातील पाच पैकी चार विधानसभा जागांवर विजय मिळवून गेल्या या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
अमेठी लोकसभा मतदारसंघात अमेठी, गौरीगंज, जगदीशपूर (अनुसूचित राखीव) तिलोई आणि सलोन या पाच विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नसला तरी भाजपलाही या मतदार संघांमधील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी मोठीच झुंज द्यावी लागत आहे.