नवी दिल्ली : 2018 मध्ये देशात दर 40 व्या मिनिटाला एक बेरोजगार आत्महत्या करत होता, अशी धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. त्यावर्षी एकूण एक लाख 34 हजार 505 आत्महत्या झाल्या. त्यात 92 हजार 114 पुरूष होते तर 42 हजार 391 महिला होत्या. तर त्यात 12 हजार 936 बेरोजगारांचा समावेश होता.
केंद्रीय गृह मंत्रालयाने हा अहवाल गेल्या आठवड्यात प्रकाशित केला. त्यात 12 हजार 936 बेरोजगारांनी आत्महत्या केल्या. एकूण आत्नहत्या करणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण 9. 6 टक्के आहे. हे सर्व जण 18 ते साठ वयोगटातील आहेत.
आत्महत्या करणाऱ्या बेरोजगारांपैकी 18 वर्षाच्या खालील वयोगटातील 31 किशोर तर नऊ किशोरवयीन युवती आहेत. 18 ते 30 वयोगटात एक हजार 240 पुरुष आणि 180 महिला आहेत तर 30 ते 45 वयोगटातील 868 पुरूष आणि 95 महिलांनी बेरोजगारीला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. 45 ते 60 वयोगटातील दोन हजार 431 पुरूष आणि 310 महिलांनी रोजगार नसल्याने मृत्यूला कवटाळले. बेरोजगारांच्या आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 10 हजार 687 पुरूष तर महिला दोन हजार 249आहेत.
सर्वाधिक आत्महत्या केरळात झाल्या, तेथे बेरोजगारांच्या एक हजार 585 आत्महत्या नोंदवल्या गेल्या. हे प्रमाण 12.3 टक्के आहे. तामिळनडू (1579) चे प्रमाण 12.2 टक्के तर महाराष्ट्रातील (1260) प्रमाण 9.7 टक्के आहे त्या पाठोपाठ कर्नाटक (1094, प्रमण 8.5 ) तर उत्तर प्रदेश (902 प्रमाण सात टक्के) यांचा क्रमांक आहे.