जगाचा पोशिंदा दुष्काळाच्या दुष्टचक्रातून कधी सुटणार?
सहा महिन्यात १३०० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा…
मुंबई: जगाला पोसणारा बळीराजा स्वतःच दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रातल्या १३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. भाजपा सरकारच्या फसव्या आश्वासनांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
कृषिक्षेत्राच्या निधीत दुपटीने वाढ, कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ४८ हजार कोटी जमा, जलयुक्त शिवार अशा योजनांचा गाजावाजा करून राज्य सरकारने खोटे दावे केले. मात्र, बळीराजाला दुष्काळाच्या संकटातून सोडवण्यात सरकार अपयशीच ठरले. त्यामुळे उभ्या जगाचा पोशिंदा दुष्काळ, नापिकीला तोंड देत सरकारी उपेक्षा सहन करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर म्हटले आहे.