इस्लामाबाद -ऐन करोना संकटातही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतद्वेषानेच पछाडलेले असल्याचे प्रत्यंतर पुन्हा आले. भारताच्या विस्तारवादी धोरणांमुळे शेजारी देशांना धोका निर्माण झाल्याचा थयथयाट इम्रान यांनी केला आहे.
भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे बांगलादेशला त्रास होऊ शकतो. चीन, पाकिस्तान आणि नेपाळशी भारताचे सीमावाद सुरू आहेत, असा कांगावा इम्रान यांनी ट्विटरवरून केला. भारताने काश्मीरवर अवैध ताबा मिळवला आहे. ती कृती युद्ध गुन्ह्याच्या स्वरूपाची आहे, अशी गरळही त्यांनी ओकली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही भारतावर निशाणा साधताना उलट्या बोंबा मारल्या.
भारत शेजारी देशांबाबत आक्रमक धोरण अवलंबत आहे. त्यामुळे विभागीय शांतता आणि सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानमधील करोनाबाधितांची संख्या 60 हजारांजवळ पोहचली आहे. त्या संकटाशी मुकाबला करताना पाकिस्तानची भंबेरी उडत आहे. मात्र, अपयश झाकण्यासाठी भारतविरोधी कांगावा करण्याचे पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांचे जुनेच धोरण इम्रान आणि त्यांचे मंत्रीही अवलंबताना दिसत आहेत.