कराची – पाकिस्तानातील इम्रान खान सरकारविरूध्द त्या देशातील सर्व विरोधी पक्ष संपूर्ण शक्तीने एकवटले आहेत. त्यामुळेच पाकचे कुख्यात लष्कर सक्रिय झाले आहे. थेट दडपशाही अथवा सरकारच्या मार्फत विरोधकांचे अटकसत्र सुरू आहे.
त्यामुळे जे काही मोजके प्रांत आहेत, तेथेही सरकारच्या विरोधात खदखद असून देशासाठी हे मारक असणार असल्याचे पाकमधील निरिक्षकांचे म्हणणे आहे.
सिंध प्रांत तसा बऱ्यापैकी सधन आणि शांत. मात्र तेथे लष्कराने सुरू केलेल्या दडपशाहीने व विरोधकांच्या मुस्कटदाबीने खदखद वाढली आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये शासकीय कार्यक्रम घेत, मोठी भाषणबाजी करत आपली टीमकी वाजवण्याची आणि भारताला दुषणे देण्याची खुमखुमी आणि उबळ पाकिस्तानी राज्यकर्त्यांना येथेच. मात्र त्या ठिकाणीही पाकिस्तानने ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानने जे केले होते, ते दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो.
सिंध प्रांतासोबतच बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनवा भागातही अशांतता आणि खदखद आहे. चीनची आणि पाकिस्तानची जवळीक वाढल्यापासून गिलगिट बाल्टिस्तान भागातही आता विरोधी सूर उमटू लागले आहेत.
काही काळापूर्वी विरोधकांना धाकात घेण्यासाठी सिंध प्रांताच्या पोलीस प्रमुखांचे अपहरण करण्यात आले. दडपशाहीच्या या प्रकारामुळे विरोधक वरमले नाहीत, उलट लष्कर आणि विशेषत: सरकारच्या विरोधात नाराजी वाढली आहे. इम्रान खान लष्कराचे बाहुले असल्याची टीका एकसुरात होउ लागली आहे.
पाकिस्तानचे कोणतेही कथित लोकनियुक्त सरकार लष्कराच्या प्रभावाबाहेर काम करू शकले नाही, हा इतिहास आहे. मात्र इम्रान खान यांचे सरकार या सगळ्याच्या वर कळस ठरले आहे. इतका दुबळा पंतप्रधान पाहिला नव्हता, अशी जाहीर टीप्पणी आता सर्वच माध्यमांतून होउ लागली आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यात सरकारी विभागांत शिरकाव केला असून त्यांना अव्हेरून कोणताही निर्णय होउ शकत नाही. संसदेचे सत्र कधी बोलवायचे, त्यावर अग्रक्रम कशाला असेल, सत्रात काय चर्चा घ्यायची याचेही थेट निर्देश या अधिकाऱ्यांकडून येत असल्याची कैफियतच एका संसद सदस्यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती.
मानवाधिकार आणि लोकशाहीसाठी लढणारे पत्रकार, ब्लॉगर आणि समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींनी अलिकडेच वेबिनारवर एका चर्चेचे आयोजन केले होते. त्यातही सरकारने आणि लष्कराने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा धुळीस मिळवल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
आज जगभरातल्या दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आश्रयस्थान ठरले असल्याचा जागतिक समुदायाचा समज झाला आहे. त्यामागे लष्कराचे आणि सरकारचे नाकर्तेपणच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानात आज लष्कराची जी मनमानी चालली आहे व त्यापुढे सरकारने मान टेकवली आहे, अशी स्थिती कधी काळी पूर्व पाकिस्तानात म्हणजे आताच्या बांगलादेशात होती. त्याचे काय परिणाम झाले हे विसरून चालणार नाही असा सावधगिरीचा इशाराही दिला गेला आहे.