नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानने विजेतेपद मिळविले. या विजयाबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान व माजी कसोटी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी संघाला शुभेच्छा देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली. मात्र, भारताचा अधिकृत संघ या स्पर्धेत सहभागी झालेलाच नाही याची खातरजमा न करताच केलेली पोस्ट इम्रान यांना भोवली व नेटक-यांनी इम्रान यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
भारताचा अधिकृत संघ या स्पर्धेत सहभागी झालेला नव्हता तर काही खेळाडू स्वत:च पाकिस्तानात या स्पर्धेत खेळण्यासाठी दाखल झाले होते. त्याचवेळी ही स्पर्धादेखील अधिकृत नव्हती हे स्पष्ट झाल्याने इम्रान यांच्यावर टीका झालीच पण त्यांची टर देखील उडविण्यात आली.
Congrats to Pakistan but 2 points
1) Few Indian players traveled without the permission of governing body to represent India. It's not official Indian team.
2) It is Circle kabbadi and not standard Kabbadi. Circle Kabaddi is not recognised by International Kabaddi federation
— chacha monk (@oldschoolmonk) February 17, 2020
लाहोरमधील पंजाब स्टेडियममध्ये कबड्डीचा सामना झाला. या अनधिकृत विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम लढतीत यजमान पाकिस्तानने भारताच्या अनधिकृत संघाचा ४३-४१ असा पराभव केला व विजेतेपद मिळवले. भारत सरकार अथवा कबड्डी फेडरेशन आॅफ इंडियाची परवानगी न घेता ४५ जण वाघा बाॅर्डर मार्गे पाकिस्तानमध्ये गेले होते आणि त्यांनी हा सामना खेळला होता.
कबड्डी फेडरेशन आॅफ इंडियाने पाकिस्तानला भारताने कोणताही संघ पाठवला नाही तसेच जो संघ अनधिकृतपणे पाकिस्तानमध्ये दाखल झाला आहे, त्यांना भारताचा ध्वज वापरण्याची परवानगी देऊ नये असेही महासंघाने स्पष्ट केले होते. जागतिक कबड्डी फेडरेशनने गेल्या सोमवारी पाकिस्तानात सुरू असलेली स्पर्धा अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले होते. भारताचे जे ४५ खेळाडूंचे पथक पाकिस्तानात दाखल झाले होते, त्यांची चौकशी केली जात आहे.