ताश्कंद – भारतासोबत मैत्रीचे संबंध व्हावेत अशी आमचीही इच्छा आहे मात्र भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा त्यामध्ये अडथळा असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले.
मध्य आणि दक्षिण आशियाई देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी इम्रान खान ताश्कंदमध्ये आले आहेत. यावेळी भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात तसेच दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही असे त्यांना छेडले असता त्यावर बोलताना ते म्हणाले की, चांगले शेजारी म्हणून सहअस्तित्व असावे असा आमचा प्रयत्न आहे.
मात्र आम्ही करणार काय? दोन्ही देशांनी एकत्र राहावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही भारताच्या पुढाकाराची वाट पाहातोय. मात्र, दोन्ही देशांच्या संबंधामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा अडथळा आहे.
दरम्यान याचवेळी त्यांना पाकिस्तान आणि तालिबानच्या संबंधांबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. पाकिस्तानचे हवाईदलच तालिबानला बळ देत असल्याचा आरोप अफगाणमधील एका मंत्र्यांनी आजच केला आहे.
तालिबानला कालच पाकच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी चलनातील मोठी रक्कम सापडली आहे. ही रक्कम सापडल्याचा दावा जरी केला असला तरी त्यामागे स्वरूप वेगळे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाक पुन्हा तालिबानला फूस देत आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. मात्र या विषयावर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले आहे.
उलट शांतता संमेलनाच्या नावाखाली आपली प्रतिमा उजळ करण्याकरता अफगाणिस्तानमधील अनेक नेत्यांना पाकिस्तानने आमंत्रीत केले आहे. अफगाणिस्तान सरकारच्यावतीने कोण सहभागी होईल, याबाबत काहीही स्पष्ट झाले नाही. तर, तालिबानने या संमेलनात उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.