हेमंत देसाई
प्रदेश संघटनेवर देवेंद्र फडणवीसांची मोहर उमटली असून, नाराज नेत्यांना सांभाळण्याची कसरतही पार पाडण्यात आली आहे. संघटनेच्या नव्या चेहऱ्यांसह भाजप ठाकरे सरकारला कसे अडचणीत आणेल, हे बघणे उद्बोधक ठरेल.
महाराष्ट्रात विधान परिषदेवर राज्यपालांतर्फे केल्या जाणाऱ्या बारा सदस्यांच्या नेमणुका रेंगाळल्या आहेत. पंधरा जूनपासूनच या नेमणुका होण्याची आवश्यकता असताना, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्याबाबत निर्णय घेत नाही आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यानुसारच हे सर्व सुरू आहे, असा आरोप शिवसेना नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत ऑक्टोबरपर्यंत काही निर्णय घ्यायचा नाही आणि तेव्हा “ऑपरेशन लोटस’ करून महाविकास आघाडी सरकार पाडायचे, असा कट रचला असल्याचा त्यांना संशय आहे.
महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी चीनच्या घुसखोरीबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी मतभेद प्रकट केले आहेत. शिवाय याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊ केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांसमवेत एकदा केंद्र सरकारला यासंदर्भातील समर्थन दिल्यानंतर पुन्हा सातारा येथील पत्रकार परिषदेत या विषयावर परत भाष्य करावे, असे पवारांना वाटले, हे सूचक आहे.
2017 व 2019 मध्ये भाजपसमवेत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची कल्पना पवार यांनीच मांडली, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सूचित केले. या आरोपास पवारांसह राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने सुस्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले नाही. असे काही घडलेच नसेल, तर त्यांनी ठामपणे या आरोपाचा इन्कार करून फडणवीस यांच्यावर बरसायला पाहिजे होते; परंतु तसे काही घडले नाही. त्यामुळे ही “तीन चाकांची गाडी’ किती काळ धावणार, असा प्रश्न सामान्यजनांच्या मनात निर्माण झाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची यादी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीतील मतभेद वारंवार समोर येत आहेत. उदाहरणार्थ, नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली एका दिवसात रद्द झाल्यानंतर, आता सरकारने दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बदल्या गृहविभागाने केल्या होत्या. एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा धक्का दिल्याचे बोलले जाते. टाळेबंदी शिथिल वा कठोर करण्याबाबत दोन किलोमीटरपर्यंतच संचार करण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील मतभेद पुन्हा पुन्हा समोर आले. या सरकारमध्ये कॉंग्रेसला कुणी विचारतच नाही, अशी भावना होऊन प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
माजी मुख्य सचिव अजोय मेहता तसेच नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत कॉंग्रेसच्या भावना तीव्र आहेत. या संदर्भात शिवसेना व कॉंग्रेसची तोंडे विरुद्ध दिशेला आहेत. एकूण, सरकारमधील मतभेद तीव्र असल्यामुळे विरोधी पक्ष म्हणून भाजपला अगदी अनुकूल अशी भूमी प्राप्त झालेली आहे; परंतु भाजपमध्येही अंतर्गत मतभेद कमी नाहीत. मात्र, ते मर्यादेबाहेर वाढणार नाहीत, याची काळजी भाजप घेत असतो.
आता प्रदेश पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना प्रस्थापित नेत्यांना बाजूला करून, महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना पूर्णतः न डावलता, निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे. खडसे यांनी फार आरडाओरड करू नये, म्हणून त्यांची सून खासदार रक्षा खडसे यांना प्रदेशमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांना उपाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे.
विधान परिषदेची उमेदवारी डावलल्या गेलेल्या पंकजा मुंडे यांना स्थान न देता, प्रीतम यांची वर्णी लावून दोघींमध्ये भांडणं लावून देण्याचा उद्योग आहे का, हे कळायला मार्ग नाही. मात्र पंकजा यांना केंद्रात जबाबदारी मिळू शकते, याचे सूतोवाच करून चंद्रकांत पाटलांनी त्यांची समजूत काढली आहे. पंकजा यांना प्रदेश सुकाणू समितीतही स्थान मिळू शकेल, असेही सांगण्यात आले असून त्याबद्दल पंकजा यांनी चंद्रकांत पाटलांचे आभारही मानले आहेत.
मात्र, आपल्याबद्दलची भूमिका स्पष्ट केल्याबद्दल आभार, हे पंकजांचे शब्दच त्यांची नाराजी दाखवून देतात.
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सरचिटणीसपदी निवड करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीच नाकारण्यात आली होती. माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल आणि संजय कुटे तसेच सुरेश हळवणकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, कपिल पाटील, डॉ. भारती पवार व जयप्रकाश ठाकूर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रसाद लाड हे आर्थिकदृष्ट्या प्रबळ नेते आहेत, तर चित्रा वाघ गेल्यावर्षीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्या आहेत. बावनकुळे यांच्याप्रमाणेच देवयानी फरांदे, सुजितसिंह ठाकूर, रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत भारतीय यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपद हे अत्यंत महत्त्वाचे असून, हे सर्वजण फडणवीस यांच्या मर्जीतले आहेत.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्यामुळे, मुख्य प्रवक्तेपद केशव उपाध्ये यांना मिळाले आहे.
यापुढील काळात भांडारी प्रवक्ते म्हणून वाहिन्यांवर न आल्यास, त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. विश्वास पाठक हे मीडिया प्रमुख म्हणून काम पाहतील. त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचा पक्षाला फायदाच होईल. मिहिर कोटेचा हे नवे खजिनदार असून, ते मुलुंडचे भाजप आमदार आहेत आणि निधी संकलनाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील, यात शंका नाही. विजय पुराणिक हे संघटन सरचिटणीसपदाची जबाबदारी पुढेही सांभाळतील.