आबुधाबी – किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करताना लोकेश राहुलने अतिशय प्रभावीत केले, अशा शब्दात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ यशस्वी कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अनेक नवोदित खेळाडूंनी आपापल्या संघांचे नेतृत्व केले. त्यात राहुलने सर्वाधिक प्रभावीत केले. त्याच्या संघाला सुरुवातीच्या यशात सातत्य राखता आले नाही, पण त्यांचा खेळ निश्चितच कौतुकास्पद होता. त्यांच्या संघ बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे, त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राहुलकडे अफाट गुणवत्ता आहे. तो एक परिपूर्ण खेळाडू असून फलंदाजीसह यष्टिरक्षण तसेच नेतृत्वही करू शकतो, असा विश्वासही त्याने दिला आहे, असेही गांगुली यांनी सांगितले.
राहुलने कसोटी क्रिकेटमध्येही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे कसोटी संघात त्याचे स्थान निश्चित आहे की नाही ते निवड समितीने ठरवणेच चांगले ठरेल. क्रिकेटच्या तीनही प्रकारात अत्यंत फिट बसणारा खेळाडू असेच राहुलचे वर्णन करावे लागेल, असेही गांगुली म्हणाले.
मॅचविनर होण्याची क्षमता..
यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा राहुल येत्या काळात भारतीय संघाचा मॅचविनर खेळाडू बनेल, असा विश्वासही गांगुली यांनी व्यक्त केला. राहुल क्रिकेटच्या तिनही प्रकारात यशस्वी ठरेल. संघाला विजय मिळवून देण्यात तो मोलाचे योगदान देईल, असेही गांगुली यांनी सांगितले.