मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सिनेसृष्टी उत्तर प्रदेशला हलवण्याच्या हालचालींवरून मोठे वादंग उठले आहे. अशातच आज उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यानी मुंबईला भेट देत राज्यात १००० एकर जागेवर जागतिक दर्जाची सिनेसृष्टी उभारणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सिने-व्यवसायातील जाणकारांशी चर्चा झाल्याचेही सांगितले. मात्र उत्तरप्रदेशात सिनेसृष्टी उभी करण्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महत्वकांक्षी असल्याचं दिसत असलं तरी सिनेसृष्टीतील एका दिग्गज कलाकाराने मात्र हे प्रयत्न असफल ठरतील असं भाकीत केलंय.
याबाबत एका नामांकित वृत्तवाहिनीशी बोलताना ज्येष्ठ अभिनेते व काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी याबाबतची भूमिका मांडली. “मुंबईमध्ये सिनेसृष्टीला एक मोठा इतिहास आहे. महाराष्ट्र आणि खासकरून मुंबई चित्रपटांचा गढ आहे. येथून देश-विदेशातील चित्रपटांची सूत्र हलतात. येथील लोकांनी खूप मेहनत केली आहे. निधी जमा केलाय. त्यामुळे कोणी प्रयत्न करत असल्याचं ठीक आहे मात्र याला राजकीय रंग न दिलेलाच बरा. मी उद्धव ठारेंच्या भूमिकेशी सहमत आहे, येथून कोणी जाणार नाही, गेला तर परत येईल.” असं ते म्हणाले.
“मी उत्तर प्रदेशात स्थापना झालेल्या चित्रपट विकास महामंडळाचा पहिला अध्यक्ष होतो. आम्ही चित्रपटाचे धोरणही बनवले होते. मात्र बर्याच समस्या आहेत. माझ्या नंतर जया बच्चन आल्या. मी त्याच अनुभवावर सांगत आहे, बर्याच लोकांनी प्रयत्न केले आहेत, काही प्रमाणात ते यशस्वी होईल, पण जर कोणी इथून संपूर्ण चित्रपटसृष्टी घेऊन जायचा विचार करत असेल तर ते अशक्य आहे.” असा दावाही सिन्हा यांनी बोलताना केला.