नवी दिल्ली – सणासुदीच्या काळात डाळींचा पुरवठा वाढावा याकरिता केंद्र सरकारने मसूर डाळीवरील आयात शुल्क वीस टक्क्यांनी कमी केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 31 ऑक्टोबरपर्यंत चालू राहील.
अमेरिका वगळता इतर देशांतून येणाऱ्या डाळीच्या आयातीवरील शुल्क 30 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. तर अमेरिकेतून येणाऱ्या डाळीवरील 50 टक्क्यांवरून 30 टक्के करण्यात आले आहे. यावर्षी डाळींचे उत्पादन 23.15 दशलक्ष टन झाले आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल भारतीय डाळ आणि अन्नधान्य व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले की, सरकारने दीर्घ पल्ल्याचे धोरण जाहीर करण्याची गरज आहे. अन्यथा अशा निर्णयामुळे भारतातील शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होते.