नवी दिल्ली – एक खेळाडू म्हणून जेव्हा देशाचे प्रतिनिधित्व करत असतो तेव्हा आपली मते तसेच वैयक्तिक आवडी-निवडी महत्त्वाच्या नसतात. देशाकडून खेळणेच जास्त महत्त्वाचे असते, असे मत भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने व्यक्त केले आहे.
नव्याने नियुक्त झालेले संघ प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याशी असलेले मतभेद मागे टाकून आम्ही संघाच्या भविष्याच्या दृष्टीने पुढे जात आहोत, असे सांगत मितालीने पोवार यांच्याशी असलेल्या मतभेदांना पूर्णविराम दिला आहे.
इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी मिताली भारतीय संघासह विलगीकरणात आहे. सात वर्षांनंतर भारतीय संघ प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोवार यांच्या मार्गदर्शनाखालील ही पहिलीच मालिका आहे. 2018 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर मिताली व त्यांच्यातील मतभेदही चव्हाट्यावर आले होते. त्यावेळी पोवार यांना डच्चूही देण्यात आला होता.
मितालीला त्या सामन्यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे दोघांनीही एकमेकांवर आरोप केले होते. त्यावेळी पोवार यांच्या जागी माजी कसोटीपटू वुकेरी रमण यांची नियुक्ती झाली होती. मात्र, काही काळातच त्यांनाही हटवले गेले व पुन्हा पोवार यांच्याकडेच प्रशिक्षकपद देण्यात आले. आता येत्या काळात भारतीय महिला संघातील हे मतभेद दूर होऊन संघ इंग्लंडविरुद्ध कशी कामगिरी करतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.