पिंपरी – रेशनमधील काळाबाजार बंद करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने प्रत्येक ग्राहकाचे रेशनकार्ड आधार क्रमांकाला जोडणे बंधनकारक केले होते. त्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु अद्यापही अनेकांनी आधारकार्ड रेशनकार्डला जोडले नसल्याने अशा कार्डधारकांचे मार्च महिन्यापासूनचे रेशन मिळणे बंद होणार आहे.
रेशन घोटाळे तसेच पात्र नसलेल्या ग्राहकांची नावे यादीत समाविष्ट करत त्यांच्या नावाने उकळले जाणारे रेशन आणि यातून होणारी शासनाची फसवणूक बंद करण्यासाठी शासनाने रेशन वितरण प्रणालीमध्ये मोठे बदल केले आहेत. बायोमेट्रिक प्रणालीसह धान्याचे वितरण तसेच प्रत्येक रेशनकार्डला आधारकार्ड लिंक करणे, रेशन कार्डला नाव असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. यातून पात्र आणि खरोखर गरज असलेलेच लाभार्थी समोर येतील. त्यामुळे आपोआपच इतरांची नावे कमी होतील.
साहजिकच त्यांचे धान्यही वाचेल. हे धान्य इतर गरजू नवीन लाभार्थींना देणे शक्य होईल, अशी शासनाची धारणा आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येकाचे आधारकार्ड रेशन प्रणालीला लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यास जानेवारी अखेरची दिलेली मुदतही वाढवून 15 फेब्रुवारी केली होती. आता ही वाढीव मुदत देखील संपली आहे.
त्यामुळे ज्यांचे आधार जोडले असेल त्याच लाभार्थींना धान्य मिळेल. इतरांना धान्य मिळणार नाही. त्यांनी धान्य घेण्यासाठी आपल्या घराजवळील स्वस्त धान्य दुकानदारांकडून आपले आधार तत्काळ लिंक करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.