पुणे – लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर राज्यभरातील व्यवहार सुरु झाले. याच अनुषंगाने नोकरी, व्यवसायानिमित्त रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून इंटरसिटी गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी अनेक दिवसांपासून करत आहेत. या गाड्या सुरू करण्यास रेल्वे तयार आहे. परंतु, रेल्वेला राज्य सरकारच्या ‘ग्रीन सिग्नल‘ची प्रतीक्षा असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून रेल्वेची प्रवासी वाहतुकीला स्थगिती देण्यात आली आहे. या कालावधीत रेल्वेकडून विशेष, श्रमिक, पार्सल आदी गाड्या सोडण्यात येत होत्या. मात्र, अनलॉकमध्ये शासकीय आणि खासगी कार्यालये सुरू झाल्यामुळे रेल्वेने कामाच्या ठिकाणी ये–जा करणाऱ्या प्रवाशांकडून इंटरसिटी गाड्यांसह, डेमू, लोकल गाड्या सोडण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये प्रामुख्याने पुणे–मुंबई, पुणे–दौंड, पुणे–लोणावळा या मार्गांवरील गाड्यांबाबत मागणी करण्यात येत होती. राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीनुसार आंतरजिल्हा वाहतूक करता येणार आहे. पण, प्रवाशांकडून दोन शहरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेसची मागणी करण्यात येत आहे.
नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे जिल्ह्यातून पुणे आणि पिंपरी–चिंचवड शहरात, पुणे–मुंबई, पुणे–लोणावळा या मार्गांवर प्रवास करणाऱ्यांची नागरिकांची संख्या अधिक आहे. रेल्वे गाड्या बंद असल्याने खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे आर्थिक आणि वेळेचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. रेल्वेचे तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे असल्याने नागरिकांकडून “पीक अवर‘मध्ये गाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी गाड्या रद्द केल्या होत्या. पुणे–मुंबईसह विविध मार्गांवर इंटरसिटी, पॅसेंजर आणि लोकलचे संचलन सुरू करण्यासाठी पुणे रेल्वे विभाग पूर्णत: तयार आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आणि मागणी केल्यानंतरच मध्य रेल्वे प्रशासन याबाबत निर्णय घेईल. मुख्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतरच संचलन सुरू करता येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी दिली.