नवी दिल्ली – पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सीएससीवर ई-केवायसी करून घेण्यासाठी एका खातेदारासाठी प्रत्येकी 15 रुपये आकारले जातील, अशी माहिती केंद्र सरकारच्या सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार राकेश यांनी दिली आहे. त्यामुळे मार्च 2022 पासून पुढचे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला त्याआधी ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे.
जाणून घ्या e-KYC कशी करायची?
eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमची ओळख पडताळून पाहिली जाते. eKYCसाठी सगळ्यात आधी तुम्हाला pmkisan.gov.in संकेतस्थळावर जावे. ही वेबसाईट उघडल्यावर सगळ्यात वरती तुम्हाला लाल अक्षरात एक सूचना दिसेल. “eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. Pls. click eKYC option in Farmer Corner for Aadhar based OTP authentication and for Biometric authentication contact nearest CSC centres” – अशी ही सूचना आहे. त्यानुसार तुम्ही ई-केवायसी करू शकता. तसेच जवळील नागरी सुविधा केंद्रातून केवायसी करू शकता.
पीएम किसान योजना काय आहे?
पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचा हप्ता मिळतो. 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. यंदा मात्र तिसरा हप्ता जानेवारी 2022 मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आला.
दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला. केंद्र सरकारने दहाव्या हप्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केलेली नव्हती. त्यामुळे ई-केवायसी केलेली नसतानाही दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. मात्र, आता मार्चनंतरच्या हपत्यासाठी ईकेवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.