नवी दिल्ली : करोना रुग्णावर उपचार करण्याबाबत केंद्र सरकारने सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्लाझ्मा थेरपीसंदर्भात केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून करोना रुग्णांवर उपचारपद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता.ती थेरपी आता उपचारातून वगळण्यात आली आहे.
दरम्यान केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने करोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळले आहे. यासंबंधी टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.
आतापर्यंत करोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी होती. केवळ सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता. दरम्यान टास्क फोर्सने आता प्लाझ्मा थेरपीला उपचारांमधून वगळले आहे.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एम्स दिल्ली आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर करोना उपचारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा थेरपी करोनाविरोधातील उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठीही आवाहन केले जात होते. मात्र अभ्यासातून प्लाझ्मा थेरपी परिमाणकारक नसल्याचे समोर आले आहे.
गेल्या शुक्रवारी आयसीएमआर, टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याच्या बाजूने मत नोंदवले होते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तसंच काही संशोधकांनी प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या अतार्किक वापरावर प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. विजय राघवन यांच्यासह भारतीय वैद्यकीय आयसीएमआर आणि दिल्लीतील एम्स संचालकांना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आले होते.
“भारतात प्लाझ्माचा अवैज्ञानिकपणे आणि अतार्किकपणे वापर केला जात आहे. प्लाझ्मासंदर्भात करण्यात आलेल्या ताज्या संशोधनात आढळून आलेल्या पुराव्यानुसार प्लाझ्मा उपचार पद्धतीचा रुग्णावर कोणताही चांगला परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. तरीही भारतभरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांवर प्लाझ्मा उपचार केले जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचे प्लाझ्मा दात्यांचा शोध घेताना फरफट होत आहे,” असे या पत्रात म्हटले होते.
“सध्या केल्या जात असलेल्या प्लाझ्मा उपचार पद्धतीमुळे करोनाचा अति घातक विषाणू तयार होण्याची शक्यता आहे. असा विषाणू निर्माण झाल्यास सध्याच्या महामारीच्या काळात तो पेट्रोल ओतण्यासारखाच ठरेल,” असा इशारा या तज्ज्ञांनी दिला होता.