नवी दिल्ली – देशात गव्हाच्या किमती वाढत आहेत. त्या कमी पातळीवर आणण्यासाठी आता केंद्र सरकारने राखीव साठ्यातील 30 लाख टन खुल्या बाजारासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात सर्वसाधारणपणे गव्हाच्या किमती वाढून 38 रुपये प्रति किलो या पातळीवर गेल्या आहेत.
गव्हाच्या पिठाच्या किमतीही वाढल्या आहेत. हा गहू पीठ तयार करणारे कारखाने आणि व्यापाऱ्यांना उपलब्ध करण्यात येणार आहे. या अगोदर 19 जानेवारी रोजी पत्रकाराची बोलताना केंद्रीय अण्णा सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले होते की, गव्हाच्या किमती वाढत असल्याची बाब आमच्या निदर्शनास आली आहे. त्या कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात चर्चा चालू आहे. बुधवारी हा निर्णय घेण्यात आला.
आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा गहू खुल्या बाजारात विकणारुआहे. परदेशातून गहू आलेला नाही. देशातील पीठ तयार करणाऱ्या कारखान्यांनी आणि व्यापाऱ्यांनी या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लवकरात लवकर गहू व्यापाऱ्यांना विकावा अशी सूचना केली होती.
सरकारकडे बराच काळ पुरेल एवढा गव्हाचा आणि तांदळाचा साठा आहे. त्यामुळे या आघाडीवर फारशी चिंता करण्याची गरज नाही असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. गव्हाच्या मर्यादित साठ्याचा परिणाम किमतीवर होऊ शकतो याचा अंदाज सरकारला आला होता. त्यामुळे मे महिन्यामध्ये केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे.
गव्हाच्या उत्पादनावर परिणाम
तपमान वाढल्यामुळे गेल्या वर्षी गव्हाचे उत्पादन कमी होऊन 106.84 दशलक्ष टन झाले होते. त्या अगोदरच्या वर्षांत देशात 109.59 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन झाले होते. यावर्षी गव्हाचे उत्पादन काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कारण पेरणी जास्त क्षेत्रफळावर झाली आहे. एप्रिल पासून केंद्र सरकार गावाची खरेदी सुरू करेल.