पुणे – केंद्र सरकारने मोफत अन्न-धान्य योजनेला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण 27 लाख 11 हजार 159, तर पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 12 लाख 69 हजार व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. यामध्ये प्रतिव्यक्तीला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे.
भारतीय अन्न महामंडळाकडून चांगले सहकार्य मिळत आहे. या महिन्यातही रेशनवरील गहू अन् तांदूळ चांगल्या दर्जाचे मिळाले आहे. पुणे शहरासाठी जवळपास 12 हजार 600 मेट्रिक टन इतका तांदूळ आणि गहू या महिन्यात मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यातील जवळपास 95 टक्के वाटप करण्यात आले. पुणे तसेच पिंपरी शहरात काही दिव्यांग, आजारी नागरिक आहेत. त्याचबरोबर काहींना वेगवेगळ्या कारणास्तव धान्य घेता येत नाही किंवा प्रत्यक्ष स्वस्त धान्य दुकानांपर्यंत येणे शक्य होत नाही. अशा सर्व नागरिकांना घरपोच धान्य पुरवण्याची व्यवस्था केल्याचे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.