इंदापूर – राज्यातील करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरू झाली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं. तर काही जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता राज्यातील लॉकडाऊन संदर्भात ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, पंरतु, नागरिकांनी लॉकडाऊन करावं लागेल अशी स्थिती आणू नये, असं भरणे यांनी म्हटलं आहे. ते इंदापुरात बोलत होते. महाराष्ट्रात सर्वत्र करोना वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोनाने डोक वर काढलं आहे. या पार्श्वभूमीवर भरणे यांनी आढावा बैठक घेतली.
करोनाचे संकट संपलेले नाही, करोना गेला नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज असल्याचे दत्ता भरणे यांनी सांगितले. इंदापूर शहर आणि तालुक्यात जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश भरणे यांनी पोलिसांना दिले आहेत. दरम्यान पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच लॉकडाऊनच्या नावाखाली अनेक जण शेतकऱ्यांची पिळवणूक करतात, त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही, पण लोकांनीही काळजी घेण्याचे आवाहन भरणे यांनी केली.